Latur News – सजग नागरिकाने वेळीच फोन केला आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

बालविवाहावर बंदी असतानाही राज्याच्या कानाकोपऱ्यात अजूनही लपूनछपून बालविवाह केले जात आहेत. अशीच घटना आता लातूरमध्ये घडल्याच उघडकीस आलं आहे. एका सजग नागरिकाने वेळीच फोन केल्यामुळे आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मुला-मुलींच्या आई-वडिलांच प्रबोधनही केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 वर फोन करून एका नागरिकाने लातूर तालुक्यातील 12 नंबर परिसरात बालविवाह होणार असल्यासंदर्भात माहिती लातूर पोलिसांना दिली. त्यावरून डायल 112 येथील कार्यरत पोलीस अधिकारी/अमलदारांनी तत्परतेने कारवाई करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदरची माहिती दामिनी व भरोसा सेलच्या पथकाला दिली. त्यावरून भरोसा सेलचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख व त्यांच्या पथकाने वेळेत सदर ठिकाणी पोहोचून होणारा बालविवाह थांबविला तसेच बालविवाह लावणाऱ्या पालकांना नोटीसा देऊन बालकल्याण समिती समोर हजर राहण्यासंदर्भात समज दिली आहे.

सजग नागरिकाने डायल 112 वर दिलेल्या माहितीवरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांच्या भरोसा सेल व दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, डायल 112 युनिटचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ ढोले, पोलीस अंमलदार नितीन कोतवाड, चिंतामणी पाचपुते, चित्रा कुंभार, शंकर बुड्डे, चालक पल्लवी चिलगर तसेच सोबत चाइल्ड लाइनचे बापू सूर्यवंशी यांनी अतिशय तत्परतेने कारवाई करून वेळीच बालविवाह रोखला आहे.

Comments are closed.