गणेशोत्सवात थंडावलेली कारवाई पुन्हा जोरात; दिव्यातील 5 बेकायदा इमारतींवर बुलडोझर, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासन इन अ‍ॅक्शन

गणेशोत्सवात बेकायदा बांधकामांविरुद्ध थंडावलेली ठाणे महापालिकेची कारवाई आता पुन्हा सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून आज दिव्यातील पाच बेकायदा इमारतींवर बुलडोझर फिरवला. अतिक्रमणविरोधी विभागाने या इमारती तोडण्यास सुरुवात केल्याने भूमाफिया आणि बिल्डरलॉबीचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे दहा कुटुंबे बेघर झाली आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये दिवा शहरात बेकायदा इमारतींचे पेव फुटले. बिल्डरांनी सर्व नियम धाब्यावर बसवून मोठमोठ्या इमारती उभारल्या. अनेक गरजूंनी कर्ज काढून तसेच दागिने विकून ही घरे विकत घेतली. मात्र सर्व बेकायदा इमारतींवर हातोडा चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दिव्यात आज तोडलेल्या पाचपैकी दोन इमारतींमध्ये १० कुटुंबे राहत होती, तर अन्य तीन इमारती रिकाम्या होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिव्याच्या बी.आर. नगरमधील दोन, सद्‌गुरूनगरमधील दोन तसेच दिवा-शिळरोड येथील एका बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे व मनीष जोशी यांनी दिली.

  • बेकायदा बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिला होता. गणेशोत्सव संपताच पालिकेने आजपासून विशेष मोहीम हाती घेत कारवाईचा बडगा उगारला आहे.
  • आतापर्यंत जवळपास २२७ बांधकामांवर कारवाई झाली असून २४ गुन्हे दाखल झाले आहेत. कारवाईदरम्यान अडथळा आणल्यास त्वरित गुन्हा दाखल करावा असे आदेश देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चाप लावण्यासाठी विशेष पथके

बेकायदा बांधकामांचे माहेरघर असलेल्या ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा येथील बांधकामांवर करडी नजर ठेवण्यात आली. गणेशोत्सव काळात या बेकायदा बांधकामांना चाप लावण्यासाठी तसेच या भागातील बांधकामांवर देखरेख करण्यासाठी पालिका आयुक्तांनी विशेष पथके तयार केली. दिवा आणि मुंब्रा भागातून बेकायदा बांधकामांच्या जास्त तक्रारी येत असल्याने पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याची शहानिशा केली आहे.

अधिकृत घरांमध्येच संसार थाटा

स्वप्नातील घरे घेताना फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी घरे खरेदी करण्यापूर्वी ती इमारत अधिकृत आहे की अनधिकृत आहे याची खातरजमा शहर विकास विभागाशी संपर्क साधून करावी असेही आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेकरांनो अधिकृत घरांमध्ये संसार थाटा असे आयुक्त सौरभराव यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.