’शेवग्याच्या शेंगा’ पुन्हा रंगभूमीवर, गजेंद्र अहिरे करणार दिग्दर्शन

मागील काही वर्षांमध्ये नवीन नाटकांच्या जोडीला जुनी गाजलेली मराठी नाटके पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक गर्दी करू लागले आहेत. यामध्ये नव्या संचात पुन्हा रंगभूमीवर आलेल्या जुन्या नाटकांचा मोलाचा वाटा आहे. मराठी रसिकांच्या मनात घर केलेले ’शेवग्याच्या शेंगा’ हे सदाबहार नर्मविनोदी नाटक नवीन संचात पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दाखल होणार आहे. या नवीन संचातील ’शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाची जोरदार तालीम सुरू असुन या महिन्याअखेरीस नाटकाचे प्रयोग सुरू होतील.
लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी 10 एप्रिल 2015 रोजी सर्वप्रथम ’शेवग्याच्या शेंगा’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणले होते. त्यात स्वाती चिटणीस आणि संजय मोने यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता दहा वर्षांनंतर “मिलाप थिएटर्स’’ या नाटकाची पुर्ननिर्मिती करत आहे. या नाटकाचे लेखन गजेंद्र अहिरे यांनी केले असून त्यांनीच पुन्हा नव्याने नाटक दिग्दर्शितही केले आहे. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही एव्हरग्रीन जोडी या नाटकात मुख्य भूमिका साकारणार असून त्यांच्यासोबत नंदिता पाटकर, अपूर्वा गोरे, अंकिता दिप्ती, साकार देसाई हे कलाकारही नाटकात आहेत.
Comments are closed.