बिहार प्रमाणेच, लवकरच देशभरात मतदार पडताळणी होईल

केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आढावा बैठक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निवडणूक आयोग देशभरात विशेष सघन सुधारणा (एसआयआर) म्हणजेच मतदारयादी पडताळणी करणार आहे. याबाबत बुधवारी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी उपस्थित होते. यामध्ये देशभरात ‘एसआयआर’ करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. आता निवडणूक आयोग लवकरच याबाबत अधिसूचना जारी करू शकते.

देशभरात एकाचवेळी ‘एसआयआर’ घेण्यात येणार आहे. दिल्लीत बुधवारी झालेल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यावर सखोल चर्चा झाल्यानंतर प्राथमिक नियोजनही करण्यात आले. तथापि, देशभरात एसआयआर कधी सुरू होईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. तारखेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

राज्यांनी दिली तयारीची माहिती

अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) त्यांच्या तयारीचा तपशील आयोगासमोर सादर केला. बैठकीत राज्यांनी एसआयआरसाठी कोणत्या स्तरावर ते तयार आहेत आणि त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते हे सांगितले. निवडणूक आयोग ईशान्येकडील राज्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन त्या राज्यांमध्ये कागदपत्रांची अंतिम यादी तयार करणार आहे. प्रत्येक राज्यात बिहारसारखे 11 कागदपत्रे असणे आवश्यक नसली तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश पाळून निवडणूक आयोगाला नियोजन करावे लागणार आहे.

बिहारनंतर मतदारयादी पडताळणीची प्रक्रिया देशभरात राबविण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या मते मतदारयादी अपडेट करणे आणि परदेशी नागरिक, मृत व्यक्ती किंवा स्थलांतरित झालेल्या बेकायदेशीर मतदारांना काढून टाकणे हा ‘एसआयआर’मागील मुख्य उद्देश आहे. या सर्वेक्षणापूर्वी अनेक राज्यांमध्ये बांगलादेश आणि म्यानमारमधील स्थलांतरितांवर कारवाई सुरू आहे. सद्यस्थितीत ही प्रक्रिया चालू वर्षअखेरीस सुरू होईल असे संकेत मिळत आहेत. या सर्वेक्षणानंतर 2026 मध्ये होणाऱ्या आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारयादी अपडेट करता येईल. मतदारयाद्यांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न सध्या निवडणूक आयोगाकडून सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Comments are closed.