आदित्य ठाकरे यांची म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक, पागडीअंतर्गत येणाऱ्या मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत चर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी म्हाडा चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एस जयस्वाल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पागडीअंतर्गत येणाऱ्या अत्यंत धोकादायक व जिर्णावस्थेतील इमारतींबाबत चर्चा केली. याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
”आज आमदार अनिल परब आणि मी, पागडी एकता संघाच्या पदाधिकाऱ्यांसह म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एस जयस्वाल यांची पागडीअंतर्गत येणाऱ्या अत्यंत धोकादायक व जिर्णावस्थेतील इमारतींबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली. मुंबईत 13800 पेक्षा अधिक इमारतींमध्ये जवळपास 10 लाख कुटुंबं गेली 70 वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास आहेत. मविआ सरकारच्या काळात, भाडेकरूंना हक्क देणारे म्हणजेच मालकाने पुनर्विकासास नकार दिल्यास भाडेकरूंना तो करण्याचा अधिकार देणाऱ्या कायद्यात बदल करण्यात आले होते. मात्र, आता हे बदल ‘कायदेशीररित्या सक्षम प्राधिकरण/संस्था कोण?’ या कारणास्तव थांबविण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आम्ही भर दिला: 1) भाडेकरूंना पुनर्विकासाचा अधिकार देणाऱ्या दुरुस्तीच्या न्यायालयीन प्रकरणांवर तातडीने निकाल देण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी. 2) 1965 पूर्वीच्या सर्व सेस इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्पष्ट निर्देश द्यावा, जो मालक किंवा भाडेकरूंना लागू होईल. या इमारतींपैकी बहुतांश अत्यंत जिर्णावस्थेत असून त्यात राहणे धोकादायक झाले आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
Comments are closed.