Kokan News- मोबाईल नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा थेट झाडावरच्या मचाणावर !

दुर्दम्य इच्छा शक्ती असेल तर प्रत्येक समस्येवर मार्ग काढू शकतो हे खर! संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे गावामध्ये एंटरनेट, मोबाईल सेवा येत नसल्याने, जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुले निपुण भारतची परीक्षा देण्यापासून वंचित राहत होती. ही बाब केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शक्कल लढवत थेट मुलांची परीक्षा झाडावर बांधलेल्या मचाणावर घेऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.

अशक्य ते शक्य केल्याने दत्ताराम गोताड यांच्या या कृतीचे कौतुक नुसते केंद्रात, तालुक्यात, जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता याची दखल थेट स्टेट कौन्सील ऑफ इज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पुणे यांनी घेतली व दत्ताराम गोताड यांच्या कृतीचे कौतुक व अभिनंदन केले. नारडुवे सडेवाडी शाळेत मोबाईलला नेटवर्क नाही व निपुण भारत ही परीक्षा दुसऱ्या गावात जाऊन देण्यासाठी, गावाबाहेर मुलांना पाठवायला पालक तयार नाहीत. अशी स्थिती असताना या ग्रामीण भागात, माखजन, धामापूर, कासे केंद्राचे केंद्रप्रमुख असलेले दत्ताराम लक्ष्मण गोताड हे शाळेत पोहचले. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. काहीही झाल तरी निपुण भारतची ऑनलाईन परीक्षा द्यायची विद्यार्थ्यांची तीव्र आणि काहीही झाल तरी विद्यार्थ्यांना वंचित ठेवायचं नाही हा केंद्रप्रमुखांचा संकल्प. हा संकल्प पुरा करायला त्यांच्या इच्छाशक्तीने मदत केली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सदानंद जोगळे नावाच्या विद्यार्थ्याने घाबरत विचारले, साहेब, तुम्हाला झाडावर चढता येत का ? ५५ वर्षांच्या केंद्रप्रमुखांनी पटकन हो म्हटलं. विद्यार्थी म्हणाला मग साहेब सोप्प आहे. डोंगरात एका ठिकाणी झाडावर मचाण बांधलेली आहे. त्या मचाणावर मोबाईलला रेंज येते. तिथे कॉलेजची मुलं बसतात. लगेच केंद्रप्रमुख व सात विद्यार्थ्यांना घेऊन पायपीट करून मचाणापर्यंत पोहचले. मुलांना एक एक करून वर चढवून स्वतः मचाणावर पोहचले. मोबाईल नेटवर्क आल्याने विदयार्थ्यांच्या आणि पर्यायाने केंद्रप्रमुखांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर आली. निपुण भारतची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली व विद्यार्थी यशस्वी झाले. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे या म्हणीचा प्रत्यय मुलांना आला. मचाणावर पोहचल्या पोहचल्या पहिल्यांदा केंद्रप्रमुख यांनी सदानंद जोगळे याची सर्वप्रथम परीक्षा घेतली व त्याने सर्व स्तर प्राप्त केले. सर्वच विद्यार्थी यशस्वी झाल्याने ५५ वर्षांमध्ये आले सर्वोत्तम अनुभव असल्याचे केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांनी सांगितले.

Comments are closed.