मृत महिला 36 वर्षानंतर अवतरली, नागपुरात झाली मायलेकींची भेट
36 वर्षांपूर्वी एक महिला नागपुरातून बेपत्ता झाली होती. तिच्या मुलीला वाटलं की तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. पण अचानक 36 वर्षानंतर ही महिला परत आली. तब्बल 36 वर्षानंतर या माय लेकीची भेट झाली आणि दोघींच्या डोळ्यांत पाणी आलं.
महिमा (नाव बदललेले) ही महिला नागपुरात राहत होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. नवरा सतत दारु प्यायचा आणि मारायचा. त्यात सासूही त्रास द्यायचा. गरोदर असलेली महिमा हा सारा प्रपंच सोडून निघून गेली. वर्ष सरली, कुटुंबीयांना वाटलं की महिमा आता या जगात नसेल.
36 वर्षांपूर्वी महिमा नागूपूरच्या जैताळ्यातून गायब झाली आणि तिच्या कुटुंबाने तिला मृत समजून शोक केला. तिचा पती सहा वर्षांपूर्वी वारला, मुलगा दोन वर्षांपूर्वी आजाराने दगावला. महिमाची मुलगी आता 38 वर्षांची असून बुटीबोरी परिसरात वाढली.
2018 मध्ये, पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा येथील शासकीय निवारा गृहात महिमाचा मागोवा लागला. ती थोडीफार मराठी बोलत होती, ज्यावरून तिचे मूळ महाराष्ट्रातील असल्याचा अंदाज बांधला गेला. घर सोडून भटकंती करताना तिने आणखी एका मुलीला जन्म दिला होता.
पश्चिम बंगालमधील निवारा गृहात वाढल्यामुळे तिची दुसरी मुलगी बंगाली भाषिक झाली. 2024 मध्ये आई-मुलीला मुंबईतील कस्तुरबा महिला गृहात हलविण्यात आले. तिथल्या कर्मचाऱ्यांना तिचा नागपूरशी संबंध असल्याचा अंदाज आला, कारण ती वारंवार बुटीबोरीचा उल्लेख करीत होती.
2025 पर्यंत महिमाला नागपूरमधील शासकीय प्रियदर्शिनी महिला गृहात आणण्यात आले. तिच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे तिला पागलखाना चौक येथील प्रादेशिक मानसिक रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे समाजसेवा अधीक्षिका कुंदा बिडकर (काटेखये) आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पंकज बागडे यांनी तिच्या प्रकरणात सहानुभूतीने पुढाकार घेतला. समुपदेशनादरम्यान बिडकर यांनी महिमा ‘सोनाराजा’ हे नाव घेत असल्याचे लक्षात घेतले, जे एक टोपणनाव असावे. महिमाने अस्पष्टपणे बुटीबोरीची आठवण काढली, जिथे तिचे वडील टपालमास्तर होते.
बिडकर यांनी बुटीबोरी पोस्ट ऑफिसचे नोंदी तपासल्या, पण तिच्या वडिलांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर महिमाला गोधनी पोस्ट ऑफिसची आठवण झाली. मात्र, गोधनी पोस्ट ऑफिसच्या नोंदीतही तिच्या वडिलांचा मागोवा लागला नाही. तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर बिडकर यांना अखेर जैताळ्याचा संदर्भ मिळाला, जिथे तिचे सासरचे राहत होते.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ महाजन आणि हवालदार उषा कुंडळकर यांच्या मदतीने बिडकर यांनी प्रत्येक धागा तपासला. अखेर पोलिसांना जैताळ्यातील तिचे कुटुंब शोधण्यात यश आले आणि 36 वर्षांनंतर माय लेकीची भेट झाली.
तिची मुलगी थरथरत म्हणाली, मी आईला ३६ वर्षांपूर्वी गमावली होती. आम्हाला वाटलं ती जग सोडून गेली. प्रियदर्शिनी होममध्ये तिने आईला आणि बहिणीला अश्रूंनी मिठी मारली.
Comments are closed.