मिंधे आणि त्यांच्या लोकांमध्ये गद्दारी विषारी गुटख्यासारखी भरलेली आहे, संजय राऊत यांची जोरदार टीका

मिंधे आणि त्यांच्या लोकांनी मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी त्यांनी काय शौर्य दाखवलं? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच मिंधे आणि त्यांच्या लोकांमध्ये गद्दारी विषारी गुटख्यासारखी भरलेली आहे, गुटखा बंदी झाली तशी त्यांचीही बंदी होणार असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जे कोणी बोलत आहेत त्यांना आनंद दिघे समजले नाहीत. एकनाथ शिंदे त्यांनी एक सिनेमा काढला म्हणजे त्यांन आनंद दिघे समजले का असे नाही. त्यांच्या सिनेमातल्या 90 टक्के गोष्टी भंपक आणि खोट्या आहेत. आणि गद्दार जर आमच्यावर चाल करून येत असतील तर कठीण आहे. इतक्या वर्षात गद्दारांच्या वल्गना आम्ही खुप पाहिल्या आहेत असे संजय राऊत म्हणाले.

प्रताप सरनाईक नावाच्या धोंड्याला कुणी शेंदूर फासला? उद्धव ठाकरेंनीचा फासला ना. प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे यांचं कर्तृत्व काय आहे? मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी त्यांनी काय शौर्य दाखवलं? सरनाईक यांच्याआधीपासन राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून आमदार होण्यासाठी शिवसेनेत आले होते आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेईमानी केली. त्यांच्या घरावर ईडीची धाडी पडल्या आणि ते पळून गेले. त्यांनी राजन विचारे किंवा ठाण्यातल्या शिवसैनिकांबद्दल न बोललेलं बरं. जर राजन विचारे यांनी त्याग केला नसता तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते. विधानसभेला एकनाथ शिंदे यांना तिकीट दिलेच नव्हते, बाळासाहेब ठाकरे यांनी ते तिकीट सतीश प्रधान यांना दिलं होतं. हे जर खोटं असेल तर एकनाथ शिंदे यांनी सांगावं. एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा तिकीट हे उद्धव ठाकरेंनी दिलं. या सगळ्यांना मी साक्षीदार आहे. सतीश प्रधान यांना बाळासाहेब ठाकरेंनी उमदेवारी दिलीच होती, एबी फॉर्म दिला, त्यांच्या कपळाला देवीचं कुंकू लावलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तेव्हाही कशा पद्धतीने भाष्य केलं आणि ते तिकीट त्यांना मिळालं. पहिल्यापासून त्यांची वृत्ती ही ओरबाडून घेण्याची होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकांनी निष्ठेच्या गप्पा मारू नये त्यांनी गप्प रहावं. निष्ठावंतांनी जर त्यांना चार जोडे मारले तर त्यांनी ते खायला पाहिजे. आम्ही एक भूमिका मांडली ती भूमिका बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विषयीही नाही. शिवसेनाप्रमुखांसोबत आम्ही कुठल्याही जिल्हाप्रमुखांचा किंवा नेत्यांचा फोटो लावला नाही. देवेंद्र फडणवीसांपेक्षा, नरेंद्र मोदींपेक्षा दिघ्यांचा मोठा फोटो नक्की वापरा, तुम्ही मोदींसमोर बाळासाहेबांचाही मोठा फोटो वापरत नाहीत. यांचा पक्ष भविष्यात भाजपमध्ये विलीन होत आहे. काय हवं ते करा, हा संजय राऊत कच्च्या गुरूचा चेला नाही. हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे आणि त्याने आयुष्यभर ठाकरे कुटुंबासोबत इमाने इतबारे राहण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला अमित शहाने, ईडीने धमक्या दिल्या तेव्हा मी तुरुंगात केले पळून नाही गेलो. दिल्लीत म्हटलं होत ये मला अटक करायला. हे मर्दाचं काळीज आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी दिलंय. आम्ही ओरबडणारे नाहीत.

दिघे साहेबांचं मी अभिमानाने गौरव करतो की इतका निष्ठावान नेता, जिल्हाप्रमुख असला तरी त्याला नेत्यांचा मान होता. त्यांच्यासारखा आदर्श जिल्हाप्रमुख व्हावा असं बाळासाहेबांचं नेहमी म्हणणं असायचं. बाळासाहेब ठाकरे यांनी दिघ्यांना बढती देण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब म्हणाले की आता तुम्ही ठाण्याबाहेर काम करा. तेव्हा तेव्हा दिघ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हात जोडून, पायांना स्पर्श करून सांगितलं की साहेब मी तुमच्या चरणाशीच बरा आहे. मला ठाण्यातच राहू द्या, मी ठाण्यातच सुखी आहे. अशा निष्ठावान माणसावर हे असे गद्दार आणि बेईमान लोक तमाशा करत आहेत. हे गद्दार आहेत आणि ही गद्दारी त्यांच्या शरीरात विषारी गुटख्यासारखी भरलेली आहे. गुटखा बंदी झालेली आहे आणि त्यांच्यावरही बंदी येणार आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Comments are closed.