Ratnagiri News – निसर्गाने दगा दिलेला आणि सरकारने वाऱ्यावर सोडलेला आंबा बागायतदार रस्त्यावर उतरला, मदतीसाठी शिवसेना धावली

हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे दरवर्षी संकटात सापडणारा आंबा आज आक्रमक होत रस्त्यावर आला. निसर्गाच्या संकटापुढे हवालदिल झालेला आणि सरकारने वाऱ्यावर सोडलेल्या आंबा बागायतदारांच्या मदतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धावला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंबा बागायतदार यांच्या आंदोलनात शिवसैनिक सहभागी झाले. कोकणातील आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध करत आंबा बागायतदारांना न्याय मिळे पर्यंत आपण लढत राहू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.

कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. मोठ्या संख्येने आंबा बागायतदार या आंदोलनात सहभागी झाले होते.

धरणे आंदोलनात आंबा बागायतदारांनी आपल्या मागण्यांचा पुनरूच्चार केला आहे. यामध्ये २०१५ पासूनची आंबा बागायतदार आणि रत्नागिरीतील शेतकऱ्यांची कर्ज सरसकट आणि विनाअट माफ करावी.या कालावधीत ज्या शेतकऱ्यांकडून बॅंकांनी जबरदस्तीने कर्ज वसूल केली आहेत त्यांना ती रक्कम परत करावी. पुनर्गठन कर्जावरील व्याजाच्या रक्कमा विनाअट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून सरकारने आपला व्याजमाफीचा शब्द पाळावा. यंदाच्या हंगामात अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदाराचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे बागायतदारांना सरकारने नुकसानभरपाई द्यावी. पीकविम्याचा कोकणातील शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही त्यामुळे पीकविम्याचे निकष बदलावेत. कोकणातील फळझाडे कायमस्वरूपी असतात त्यामुळे कोकणातील फळझाडांना ई-पीक पहाणी अट रद्द करावी. महावितरणच्या स्मार्ट मीटरमुळे दुप्पट बील येत आहे त्यामुळे स्मार्ट मीटर बसवू नयेत. माकड आणि अन्य वन्य प्राण्यापासून शेतीचे नुकसान होत आहे अशावेळी सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी केली. या आंदोलनात रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादक संघ,पावस परिसर आंबा उत्पादक संघ, मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघ आडिवरे, रवळनाथ आंबा उत्पादक संघ करबुडे, युनिट ऑफ मूल निवासी समाज, ओबीसी संघर्ष समिती आणि मच्छिमार सहभागी झाले होते.

Comments are closed.