धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट

धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहे. पुराचे पाणी शेतीत घुसल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. घरं-दारं, जनावरं वाहून गेली असून पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नद्यांची पाणी पातळी पुन्हा वाढत असून कळंब तालुक्यातील संजीतपूर या ठिकाणी असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तसेच परिसरातील शेतामध्येही गुडघ्याएवढे पाणी साचले आहे.

हवामान खात्याच्या वतीनेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून धाराशिवला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नांदेडला ‘ऑरेंज अलर्ट’, विष्णुपुरी प्रकल्पाचे 16, तर इसापूर धरणाचे 9 दरवाजे उघडले; सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

ओमराजे-कैलास पाटील बांधावर

धाराशिवमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू आहे. शुक्रवारी रात्री कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील आवाड शिरपूरा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची शेतकऱ्यांसमवेत पाहणी केली.शेतकरी भरीव आणि ठोस मदतीसाठी आवाज उठवतोय, पण सरकार अजूनही पंचनाम्याच्या नाटकात रमलेलं आहे. सरकारने फसगत न करता तातडीने ठोस आणि भरीव मदत देणे आवश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाचा आवाज रस्त्यावर दिसेल, असा इशारा कैलास पाटील यांनी दिला.

Comments are closed.