आम्ही तुमचा काळ ठरणार आहोत; POK मध्ये शहाबाज शरीफ सरकारविरोधात असंतोष उफाळला

पाकिस्तानव्याप्त कश्मीरमध्ये शहाबाज शरीफ सरकारविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. पाकव्याप्त कश्मीरमध्ये नागरिकांचा असंतोष उफाळला असून त्यांनी तीव्र निदर्शने केली. लष्कराच्या अत्याचारांविरुद्ध आणि निदर्शकांच्या ३८ मागण्या पूर्ण करण्यात अपयश आल्याने आंदोलन तीव्र झाले आहे. पीओकेमधील नेते आणि लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. आम्ही तुमचा काळ ठरणार आहोत आणि कश्मीर लवकरच स्वतंत्र होईल, असा नाराही आंदोलकांनी दिला.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली आहेत, हजारो लोक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. मुझफ्फराबाद, रावलकोट, नीलम व्हॅली, कोटली आणि इतर भागात निदर्शने होत आहेत, जिथे जमाव सरकारी धोरणे आणि सुरक्षा दलांच्या दडपशाहीविरुद्ध आपला राग व्यक्त करत आहेत.

बुधवारी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात किमान 12 निदर्शकांचा मृत्यू झाला. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) सध्या अलिकडच्या काळातली सर्वात मोठी अशांतता अनुभवत आहे. सरकार 38 प्रमुख मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने निदर्शने सुरू झाली होती परंतु आता ती लष्करी अत्याचारांविरुद्ध मोठ्या आंदोलनात रूपांतरित झाली आहे. निदर्शनांच्या तिसऱ्या दिवशी लष्कराने गर्दी पांगवण्यासाठी गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मुझफ्फराबादमध्ये पाच, धीरकोटमध्ये पाच आणि दादयालमध्ये दोन निदर्शकांना गोळीबारात मृत्युमुखी पडले. किमान तीन पोलिसही मारले गेले.

जम्मू आणि काश्मीर संयुक्त अवामी कृती समिती (एएसी) च्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनांमुळे पीओके पूर्णपणे ठप्प झाले आहे. निदर्शक पीओके विधानसभेत पाकिस्तानात राहणाऱ्या काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या 12 जागा रद्द करण्याची मागणी करत आहेत. ते कर सवलत, पीठ आणि वीजेवरील अनुदान आणि अपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी देखील करत आहेत. निदर्शनांदरम्यान, लोक शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध घोषणा देत आहेत, क्रांती आणि काश्मीरच्या मुक्ततेची मागणी करत आहेत.

अवामी कृती समितीचे नेते शौकत नवाज मीर पीओकेमध्ये सैन्याच्या अत्याचारांवरून सरकारवर निशाणा साधत आहेत. ते म्हणाले, हे सरकार चेटकीणीसारखे आहे. चेटकीण स्वतःच्याच मुलांना खातात, असे ऐकले आहे. हे राज्य सध्या स्वतःच्या मुलांना आणि स्वतःच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न करत आहे. हे सरकार स्वतःच्या लोकांना मारेल आणि त्यांचा आवाज बाहेर पडू नये म्हणून माध्यमांवरही निर्बंध लादेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Comments are closed.