लालू कुटुंबाविरूद्ध शुल्क आकारले

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरण चांगलेच भोवणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि गाजलेल्या चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवी तसेच पुत्र तेजस्वी यादव यांच्याविरोधात आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने आरोप निश्चिती केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातील अभियोगाला लवकरच प्रारंभ होणार आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही आरोपनिश्चिती झाल्यामुळे आरजेडीला याचा मोठा फटका बसू शकतो.

लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांप्रमाणेच आणखी काही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. चारा घोटाळ्यानंतरचे हे लालू यादव यांच्या विरोधातील दुसरे मोठे घोटाळा प्रकरण आहे. चारा घोटाळ्यातील पाच प्रकरणांध्ये त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आता या नव्या प्रकरणातही त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर अभियोग चालणार असल्याने त्यांच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. हे प्रकरण राऊझ अॅव्हॅन्यू न्यायालयात न्या. विशाल गोगने यांच्यासमोर आहे. त्यांनीच आरोप निश्चिती केली आहे.

प्रकरण काय आहे…

हे 2004 ते 2009 या काळातील घोटाळा प्रकरण आहे. त्यावेळी लालू प्रसाद यादव हे तत्कालीन केंद्र सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते. त्या काळात त्यांनी आणि त्यांची पत्नी राबडीदेवी तसेच त्यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एका खासगी फर्मला रेल्वेची कंत्राटे मिळवून दिली होती. ही कंत्राटे देण्याच्या मोबदल्यात त्यांनी या फर्मकडून दिल्लीच्या मध्यवर्ती भागात भूखंड मिळविले होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. यादव यांनी आपल्या रेल्वेमंत्रीपदाचा दुरुपयोग करुन सुजाता हेटेल्स या खासगी कंपनीला रांची आणि पुरी येथील आयआयसीटीसीची दोन हॉटेल्स चालविण्याचे कंत्राट मिळवून  दिले होते, असे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. हा घोटाळा कोट्यावधी  रुपयांचा आहे.  मात्र, लालू  प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी आणि पुत्रही या घोटाळ्यात अडकल्याचे  न्यायालयाने मांडलेला आरोपपत्रात नमूद केले आहे.

सीबीआयकडून चौकशी

या प्रकरणाची चौकशी सीबीआय या केंद्रीय अन्वेषण विमागाकडून केली जात आहे.  विशिष्ट कंपनीला रेल्वेची कंत्राटे मिळावीत, म्हणून लालू यादव यांनी आपल्या मंत्रिपदाच्या अधिकारांचा दुरुपयोग केला. निविदांच्या अटींमध्ये परिवर्तन केले, तसेच कोचर नामक कुटुंबाचे भूखंड बाजारभावापेक्षा अतिशय कमी दरात पदरात पाडून घेण्यासाठी दबाव आणला, इत्यादी अनेक आरोप नमूद आहेत.

यादव कुटुंबियांकडून इन्कार

लालू प्रसाद यादव आणि त्यांचे इतर कुटुंबिय यांनी या आरोपांचा पूर्णपणे इन्कार केला आहे. हे आरोप राजकीय सूडबुद्धीपोटी ठेवण्यात आलेले असून ते धादांत खोटे आहेत. मी  किंवा माझ्या कुटुंबियांपैकी केणीही कोणतीही लाच स्वीकारलेली नाही. तसेच मंत्रिपदाचा दुरुपयोग करुन मनमानी पद्धतीने व्यवहार केला, असे अनेक आरोप त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर सध्या आहेत.

यादवांची उपस्थिती

न्यायालयात आरोपपत्राचे वाचन होते असताना लालू प्रसाद यादव हे उपस्थित होते. तथापि, त्यांचे अन्य आरोपी कुटुंबिय उपस्थित नव्हते. आपल्याला आरोप मान्य आहेत काय, असा प्रश्न न्यायालयाने त्यांना नियमांच्या अनुसार विचाराला. त्यावर लालू प्रसाद यादव यांनी आरोप मान्य नसल्याचे स्पष्ट केले.

27 ऑक्टोबरपासून अभियोग चालणार

आरोपांचे निर्धारण झाल्यामुळे आणि यादवांनी आरोप नाकारल्याने आता या सर्व आरोपींच्या विरोधात अभियोग चालविला जाणार आहे.  या अभियोगाचे कामकाज 27 ऑक्टोबर पासून होणार आहे. तसेच हा अभियोग दिन प्रतिदिन चालणार असल्याने त्याचा निर्णयही लवकरात लवकर होईल, अशी शक्यता आहे. आरोपी दोषी ठरल्यास त्यांच्या राजकीय भवितव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मात्र ते निर्दोष आढळल्यास त्यांच्यावरचे डाग पुसले जाऊन त्यांचे राजकीय भवितव्य अधिक उजळू शकते, असे राजकीय अभ्यासकांचे मत

Comments are closed.