महावितरणच्या गलथान कारभार शेतकर्‍यांच्या मुळावर, शॉर्ट सर्किटमुळे तब्बल 30 ते 40 एकर ऊस जळून खाक

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निमखेडा बु.येथे 20 ऑक्टोंबर रोजी सोमवारी दुपारी 12 वाजेदरम्यान महावितरणच्या गलथान कारभारामुळे 11 के.व्ही. मुख्य वाहिनीच्या तारांवर झालेल्या स्पार्किंगमूळे शेतकर्‍यांचा 30 ते 40 एकर ऊस जळून खाक झाला असल्याची घटना घडली आहे. सदरील घटनास्थळी शेतकर्‍यांनी लागलेली आग आटोक्यात आणण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप धारण केलेले असल्यामुळे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला असून यात लाखोचे नुकसान झालेले आहे.

वर्षभर राबराब राबत लेकराप्रमाने या पिकाला खतपाणी घालत सांभाळ केला जातो, मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसण्याऐवजी डोळ्यातून अश्रू निखळत होते. आज घडीला पूर्ण तालुक्यातच ‘महावितरणचे धोरण, म्हणजेच शेतकर्‍यांचे मरण’ अशीच काही अवस्था बघायला मिळत आहे.अनेक वर्षापासूनच्या जीर्ण झालेल्या तारा,वाकलेले खांब, तर नव्याने होणारी कामे देखील दर्जेदार होत नाही किंवा त्यात काही आर्थिक देवाण-घेवाण होत असल्यामुळे की काय लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ याची दखल देखील घेत नाहीत. त्यामुळे याबाबी गांभीर्याने घेतल्या, तर असे संकटे शेतकर्‍यांवर वारंवार येणार नाही. त्यामुळेच लोकप्रतिनिधीचे होणारे दुर्लक्ष व प्रशासनातील वरिष्ठांच्या गलथान कारभारामुळे शेतकर्‍यांवर ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हे संकट ओढवले आहे.

Comments are closed.