लग्नाची पत्रिका द्यायला मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू, भाऊ किरकोळ जखमी

लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तळवडे–आंब्रड मार्गावर घडली. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात फोंडाघाट गांगोवाडी येथील निकिता दिलीप सावंत (28) हिचा जागीच मृत्यू झाला असून तिचा भाऊ वैभव सावंत किरकोळ जखमी झाला आहे.
शाईन कंपनीची दुचाकी घेऊन वैभव आणि निकीता हे आंब्रडहून फोंडाघाटकडे येत होते. कसवण-तळवडे बौद्धवाडी येथील तीव्र उतारावर समोरून येणाऱ्या एसटी बसला साईड देताना दुचाकी रस्त्यालगतच्या ग्रीडवर घसरली. त्यात दोघेही खाली पडले. निकिताच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ती जखमी झाली, तर वैभव किरकोळ जखमी झाला.
अपघातानंतर एसटी बस चालक, वाहक व प्रवाशांनी तत्परता दाखवत दोघांनाही आंब्रड येथील डॉ. खटावकर यांच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निकीताला मृत घोषित केले.
या अपघातप्रकरणी एसटी चालक कृष्णा चंद्रकांत नेरकर (रा. कणकवली) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुचाकीस्वारावर हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
फोंडाघाट गांगोवाडी येथील दिलीप सावंत यांची कन्या निकीता सावंत ही काही दिवसांपूर्वीच मुंबईहून आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गावी आली होती. रविवारी सकाळी ती आपल्या सख्या भावासह मामाकडे पत्रिका देऊन परत येत असताना हा अपघात झाला. तिचे लग्न येत्या 3 फेब्रुवारीला होणार होते. पत्रिका छापून वाटप सुरू असतानाच काळाने हा निर्दयी घाव घातल्याने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Comments are closed.