‘इडा पिडा टळो आणि बळी राज्य येवो’ ; काय आहे बलिप्रतिपदेची कथा?

अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला ‘बलिप्रतिपदा’ हा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. पत्नीकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी औक्षण केले जाते. पाडव्याला बळीची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते. तसेच इडा, पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते. काय आहे बलिप्रतिपदेमागची कथा जाणून घेऊयात,

कथा –

बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला ‘द्युत प्रतिपदा’ असेही म्हटले जाते. बलिप्रतिपदेविषयी आणखी एक कथा सांगितली जाते, त्यानुसार असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाला हरविण्यासाठी भगवान विष्णूंची निवड करण्यात आली. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.

हेही वाचा – Diwali Padwa : यंदाचा पाडवा करा खास, जोडीने व्हा तयार

वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील.

हेही वाचा – औक्षण का करावे? काय सांगते शास्त्र?

Comments are closed.