निवडणुकीआधी शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा, अरे आता कुठे पळाला मत चोरा? उद्धव ठाकरेंचा घणाघात, फडणवीस-अजितदादांचा ऑडियो ऐकवला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून गुरुवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा आणि औसा तालुक्यातील भुसणी येथील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सात बारा कोरा करण्याबाबत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत त्यांच्या भाषणाची ऑडियो क्लीपही ऐकवली. निवडणुकीआधी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू म्हणत होते, आता शेतकरी विचारताहेत कुठे पळाला मत चोरा, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

मी इथे जाहीर सभा घ्यायला किंवा मत मागायला आलेलो नाही. मी तुम्हाला हिंमत द्यायला आलो आहे. माझ्या हातात असतील त्या अधिकाराचा उपयोग जनता, शेतकऱ्यांच्या हितासाठी करायचा आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की संकट आल्यावर सगळे फोटो काढायला येतात. फोटो लावून मदत कार्य होते. मराठवाड्यात फिरताना विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील शेतकरीही आम्हाला काही मिळाले नाही म्हणत आहेत. मग नेमके पैसे जाताहेत कुठे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

हजारो कोटींचा भ्रष्टाचार होत असून यांनी मुंबई महापालिका तर लुटून खाल्ली, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला कधी हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो का? असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. पण यांचे बगलबच्चे मस्त कमावून ऐशोरामात राहत आहेत. दुसरीकडे शेतकरी ऊन, पाऊस, थंडीत मेहन करतो, त्याच्या कष्टाला योग्य हमी भाव मिळाला नाही तर कर्जफेडीची चिंता लागेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी सोने पिकवतो, पण एका रात्रीत मातीमोल होते. मातीही वाहून गेल्याने खरडून गेलेल्या जमिनीचे करायचे काय असा प्रश्न त्यांना पडलेला आहे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी फडवणीस यांच्या भाषणाचा ऑडियोही ऐकवला. यात ते शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार आहोत. शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा.. कोरा.. कोरा… असे म्हणताना दिसतात. यावरून उद्धव ठाकरे त्यांच्यावर हल्ला चढवतात. निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा, अरे आता कुठे पळाला मत चोरा, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देण्याच्या आश्वासनाचे काय झाले याचाही समाचार घेतला.

महाराष्ट्रात दगाबाज सरकार, गावागावात फलक लावा… जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत मत नाही! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

Comments are closed.