Sharad Pawar on Election : स्थानिक स्वराज संस्थेसाठी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा- शरद पवार
पुणे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. बारामती येथील निकालांच्या संदर्भात बोलताना त्यांनी या पैशांच्या वाटपाबद्दल थेट निवडणूक आयोगाने विचार करावा, अशी मागणी केली.
'मतांसाठी अधिकृत पैसे वाटप’
पवार म्हणाले की, “मतांना पैसे देतात, तसंच सरकारकडून अधिकृत पैसे वाटप करण्यात आलं. यापुढे ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरे जात असतील, तर मग निवडणुकीबद्दल लोकांच्या विश्वासाला धक्का बसतोय.”
यावेळी त्यांनी पैशांच्या वाटपाचा परिणाम महिलांच्या मतदानावर झाल्याचे स्पष्ट संकेत दिले.
शरद पवारांचे मुद्दे:
“एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणं योग्य आहे का? हा निवडणूक आयोगाने विचार करावा.”
“निवडणूक स्वच्छ व्हाव्यात, मात्र १०-१० हजार रुपये छोटी रक्कम नाही.”
बारामतीचा संदर्भ: बारामतीचं वैशिष्ट्य होतं की, मतदानाच्या आदल्या दिवशी लोक वाट बघायचे. ते वाटप झालं की निवडणुकीचे निकाल कळायचे.
महिलांवर परिणाम: “संबंध राज्यात ५० टक्के मतदान महिलांचं आहे. त्यांना १०-१० हजार रुपये देणं आणि निवडणुकीला सामोरे जाणं, सहसा निवडणुकीसाठी असं करतायत. १० हजार रुपये भर (भरणा) त्याचा हा परिणाम असावा.”
“हा पैसा कुठला? सरकारी खजिन्यातला! सरकारी खजिना ‘मतदान करा’ ह्याच्यासाठी वापरणं हे योग्य आहे का?”
‘दोन्ही राष्ट्रवादी’ युतीवर स्थानिक पातळीवर निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि अजित पवार गट यांच्यात स्थानिक निवडणुकीत युती करण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता, त्यांनी संदिग्ध उत्तर दिले. “मला ते माहिती नाही. चर्चा आमच्यात झाली. चर्चा अशी झाली की, स्थानिक निवडणुका ह्या नगरपरिषदेच्या आहेत. ह्या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कुठे जातोय… ही निवडणूक आम्ही पक्ष म्हणून लढत नाहीये.”
त्यांनी स्पष्ट केले की, त्या-त्या तालुक्यात पक्षाचे जे सहकारी आहेत, त्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा.
मुंबई महापौरपदावर मौन
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीवर बोलताना त्यांनी फक्त “जो तो ज्याचं त्याच सांगणार,” एवढंच म्हणून अधिक भाष्य करणे टाळले.
बिहार निकालांवर प्रतिक्रिया
बिहारमधील निवडणुकीच्या निकालांवर बोलताना त्यांनी हे ‘घवघवीत यश’ असल्याचे म्हटले. “नितीशकुमार यांच्या नावाने प्रमोशन केलं, त्यामुळे काही बदललं असं वाटत नाही. या निवडणुकीचे मतदान महिलांनी हातात घेतले. महिलांनी सहभाग घेतला. १० हजार रुपये भर (वाटप) त्याचा हा परिणाम असावा.”
Comments are closed.