पोलिसांबद्दल लोकांच्या धारणा बदलण्याची गरज आहे

पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन : पोलिसिंग मजबूत करण्याची आवश्यकता

वृत्तसंस्था/ रायपूर

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये 60 वे अखिल भारतीय डीजीपी-आयजी संमेलन पार पडले असून याच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी भाग घेतला. ड्रग्जच्या गैरवापराला रोखण्यासाठी कायदे लागू करणे, पूनर्वसन आणि सामुदायिक स्तरावर हस्तक्षेपाचा दृष्टीकोन आवश्यक आहे. तसेच पोलिसांविषयी लोकांची धारणा बदलण्याची गरज आहे, खासकरू युवांमध्ये. याकरता व्यावसायिकता आणि संवेदनशीलता वाढवावी लागेल आणि शहरी तसेच टूरिस्ट पोलिसिंगला मजबूत करावे लागणार असल्याचे प्रतिपादन मोदींनी संमेलनाला संबोधित करताना केले आहे.

बंदी घालण्यात आलेल्या संघटनांवर निरंतर नजर, डाव्या उग्रवादापासून मुक्त भागांचा पूर्ण विकास आणि किनारी सुरक्षेला मजबूत करण्यासाठी नवे मॉडेल अवलंबिण्यात यावे. शहरी पोलिसिंग मजबूत करणे, टूरिस्ट पोलीस युनिट्स पुन्हा सुरू करणे आणि भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष्य अधिनियम, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढविण्यात यावी असे आवाहन मोदींनी यावेळी केले.

युवांची धारणा बदलण्याची गरज

या संमेलनाची थीम ‘विकसित भारत, सिक्युरिटी डायमेंशन’ होती, या संमेलनात अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील सामील झाले. पोलीस लिडरशिपद्वारे ‘विकसित भारता’च्याने दिशेने पुढे जाणाऱ्या विकसनशील देशांच्या अपेक्षांनुशार पोलिसिंगच्या पद्धती बदलण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी पोलिसांविषयी लोकांमधील धारणा, खासकरून युवांमधील धारणा बदलण्याची सूचना केली. प्रभावी व्यावसायिकपणा, संवेदनशीलता आणि प्रतिसादक्षमतेद्वारे ही धारणा बदलण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

रिकामी बेटांना जोडण्यासाठी नवी व्यूहनीती

रिकामी बेटांना जोडण्यासाठी नवी व्यूहनीती अवलंबिण्यात यावी, नॅटग्रिड अंतर्गत जोडलेल्या डाटाबेसचा अधिक प्रभावीपणे वापर करावा आणि कारवाईयोग्य इंटेलिजेन्स मिळविण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर करावा असे पंतप्रधान मोदींनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस विभागांना उद्देशून म्हटले आहे. विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांनी पोलीस तपासात फॉरेन्सिकच्या वापरावर केस स्टडी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, यामुळे मजबूत फॉरेन्सिक अॅप्लिकेशनमुळे फौजदारी न्याय प्रणालीत मोठी सुधारणा होईल असे मोदी म्हणाले.

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा

संमेलनात व्हिजन 2047 अंतर्गत पोलिसिंगचा दीर्घकालीन रोडमॅप, दहशतवादविरोध आणि कट्टरवादविरोधी मोहीम, महिलांची सुरक्षा वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, विदेशात पसार झालेल्या भारतीय गुन्हेगारांना परत आणण्यासाठी रणनीति आणि प्रभावी तपास निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक क्षमता मजबूत करण्यावर चर्चा झाली. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक विषयांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली आहे.

Comments are closed.