चल निघ रे…बोट दाखवत नको ते बोलला अन् ICC च्या नजरेत आला; गंभीरच्या लाडक्यावर कारवाई, नेमकं का


हर्षित राणावर आयसीसीची कारवाई भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे रायपूरमध्ये खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. रांचीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 17 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने जबरदस्त कामगिरी करत त्याच्या पहिल्या षटकात दोन मोठ्या विकेट्स घेतल्या होत्या. रायन रिकेल्टन आणि क्विंटन डी कॉक. मात्र, एका घटनेमुळे आयसीसीने त्याला तंबी देत एक डिमेरिट पॉइंटही जोडला आहे.

हर्षित राणाला शिक्षा का झाली?

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, हर्षित राणाने आयसीसीच्या ‘खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट स्टाफची आचारसंहिता’ मधील कलम 2.5 चे उल्लंघन केले आहे. हे कलम अशा कृतींशी संबंधित आहे, ज्यात आउट झालेल्या फलंदाजाचा अपमान करतात, त्याला चिडवतात अथवा उचकावतात किंवा ज्यामुळे फलंदाज आक्रमक प्रतिक्रिया देऊ शकतो. गेल्या 24 महिन्यांत हर्षितची ही पहिली चूक आहे. त्यामुळे त्याने आपली चूक मान्य करत, आयसीसी एलिट पॅनलचे मॅच रिफरी रिची रिचर्डसन याने दिलेली सजा स्वीकारली.

नेमकं काय घडलं?

रांचीतील पहिल्या वनडेत हर्षितने तिसरे विकेट म्हणून डेवाल्ड ब्रेविसला बाद केले. याआधीच्या ओव्हरमध्ये ब्रेविसने त्याच्या चेंडूवर ‘नो-लुक’ षटकार ठोकला होता. त्यामुळे हर्षितने त्याला बाद केल्यानंतर जास्त उत्साहात सेलिब्रेशन केले. त्याने त्याला बोट दाखवत पॅव्हेलियनकडे जाण्याचा इशारा केला आणि एका व्हिडिओमध्ये तो शिवी देत असल्यासारखेही दिसले. आयसीसीच्या मते, ही कृती फलंदाजाला उचकवणारी होती. त्यामुळे त्याच्या नावावर एक डिमेरिट पॉइंट नोंदवण्यात आला.

रायपूरमध्ये दुसरा वनडे सुरू…

आज रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडियममध्ये मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. येथेही केएल राहुल टॉस हरला, लक्षणीय म्हणजे, सलग 20व्या वेळेस भारत वनडेत टॉस गमावत आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये कुठलाही बदल केलेला नाही.

एकदिवसीय सामन्यांचा विक्रम

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी आतापर्यंत 95 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 41 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 51 सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघ भारतीय भूमीवर 33 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने 19 आणि दक्षिण आफ्रिकेने 14 वेळा विजय मिळवला आहे. 2006 पासून, भारत आणि दक्षिण आफ्रिकेने एकमेकांविरुद्ध 10 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी पाच जिंकल्या आहेत.

हे ही वाचा –

सामन्याच्या पहिल्याच चेंडूत 10 धावा, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया फलंदाजी करत असताना काय घडलं?, पाहा VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.