माफी मागणार नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरवरील विधानावर ठाम

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरील वक्तव्याबद्दल माफी मागण्यास ठाम नकार दिला आहे. “मी काहीही चुकीचे बोललेले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी बुधवारी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी माफी मागणार नाही. माझ्या वक्तव्यात काहीही चुकीचे नाही आणि त्यासाठी माफीची गरज नाही.” वाढत्या टीकेनंतरही त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत पुढील स्पष्टीकरण देण्यास नकार दिला.

नेमके काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात दावा केला होता. हिंदुस्थानला या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी “पूर्ण पराभव” स्वीकारावा लागल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, भारतीय हवाई दलाची विमाने पाकिस्तानी दलांकडून पाडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

चव्हाण यांनी असेही सांगितले होते की, “पहिल्याच दिवशी आपला पूर्ण पराभव झाला. 7 तारखेला केवळ अर्धा तास चाललेल्या हवाई लढाईत आपण पूर्णपणे पराभूत झालो, हे कोणी मान्य करो वा न करो.” या प्राथमिक संघर्षानंतर भारतीय हवाई दलाची विमाने गोळीबाराच्या धोक्यामुळे ग्वाल्हेर, भटिंडा आणि सिरसा या हवाई तळांवरून उडालीच नाहीत, असा दावाही त्यांनी केला होता.

Comments are closed.