बुलेट ट्रेन नको, मुंबईची लोकल सुधारा; आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या प्रकल्पांच्या श्रेयवादावरून चांगलेच तापले आहे. युवासेनाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्र्यांवर आणि भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून अर्थमंत्र्यांनी आपल्या सुमार कामगिरीवर लक्ष केंद्रित करावे’, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, केवळ दुसऱ्या राज्याचा फायदा करून देण्यासाठी लादलेली बुलेट ट्रेन महाराष्ट्राला नको आहे. प्रकल्पाच्या विलंबासाठी महाविकास आघाडीला जबाबदार धरणाऱ्या भाजपवर निशाणा साधत त्यांनी विचारले की, केंद्रात १२ वर्षे आणि राज्यात १० वर्षे सत्तेत असताना भाजपने दिलेली आश्वासने का पूर्ण केली नाहीत?

मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालत आदित्य ठाकरे यांनी ‘बुलेट ट्रेनसाठी खर्च होणाऱ्या निधीपैकी निम्मी रक्कम जरी मुंबई लोकलसाठी वापरली असती, तर २०१४ पासून प्रलंबित असलेली रेल्वेची अनेक कामे पूर्ण झाली असती’, असे स्पष्ट म्हटले आहे.

मुंबईकडून ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र’ (IFSC) बळजबरीने हिरावून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. हे केंद्र मुंबईतून नेणे हा केवळ शहराचाच नाही तर देशाचाही मोठा तोटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड करून प्रकल्प लादले जात असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंनी थेट केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.

बुलेट ट्रेन आणि मुंबई लोकलवरून आदित्य ठाकरेंची अर्थमंत्र्यांवर टीका

Comments are closed.