IND vs PAK: पाकिस्तानी संघ भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास उत्सुक! जाणून घ्या पाकचा कर्णधार सलमान आगा नेमके काय म्हणाला?

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षीच्या आशिया कपमध्ये जेव्हा हे दोन्ही संघ भिडले होते, तेव्हा भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन (Handshake) केले नव्हते. त्यामुळे आता या सामन्यात भारतीय खेळाडू तीच ‘नो हँडशेक पॉलिसी’ कायम ठेवतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने (Captain of Pakistan salman ali Agha) खेळाडूवृत्तीवर भर देत भारताशी मैत्रीचा हात पुढे केला आहे. सलमान आगा म्हणाला की, भारत-पाकिस्तान सामना खेळ भावनेने खेळला जावा. माझी टीम भारतीय खेळाडूंशी हात मिळवण्यासाठी तयार आहे. क्रिकेट जसे नेहमी खेळले जाते, तसेच ते खेळले जावे असे मला वाटते. मात्र, पुढे काय करायचे हा निर्णय सर्वस्वी भारतीय संघावर अवलंबून आहे.

सलमानने इच्छा व्यक्त केली की, भारताचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा या सामन्यात खेळावा. इन्फेक्शनमुळे अभिषेक नामिबियाविरुद्ध खेळू शकला नव्हता. यावर बोलताना सलमान म्हणाला, मला आशा आहे की अभिषेक उद्याचा सामना खेळेल. आम्हाला एका मजबूत भारतीय संघाविरुद्ध जिंकायचे आहे.

भारताचा टी-20 वर्ल्ड कपमधील रेकॉर्ड पाकिस्तानविरुद्ध अत्यंत वरचढ आहे (भारत 7 विजय, पाकिस्तान 1 विजय). यावर सलमान म्हणाला, टीम इंडियाविरुद्ध आमचा रेकॉर्ड चांगला नाही हे मान्य आहे, पण आम्ही इतिहास बदलू शकत नाही. प्रत्येक दिवस नवीन असतो आणि आम्ही उद्या चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.

Comments are closed.