अजितदादांच्या माघारी राष्ट्रवादी अडचणीत, नरहरी झिरवळ संकटात, पक्ष सावरायला सुनेत्रा वहिनी पुढे

सुनेत्रा पवार आणि नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन खात्याच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंध खात्याने (ACB) रंगेहाथ पकडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) प्रतिमा डागाळली होती. लाचखोरीच्या या प्रकरणामुळे नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून अजित पवार यांच्या माघारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच मोठ्या कोंडीत सापडला आहे. हे प्रकरण पुढे करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विरोधकांकडून चिखलफेक सुरु आहे. अमोल मिटकरी वगळता पक्षाचा एकही बडा नेता नरहरी झिरवळ यांच्या समर्थनासाठी पुढे आला नव्हता. एकूणच या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता या अडचणीतून पक्षाला बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच पुढाकार घेतला आहे.

नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाबाबत चर्चा करण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची सोमवारी संध्याकाळी सहा वाजता तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. नरहरी झिरवळ प्रकरणात नेमक काय झालं, याची सत्यता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य समजून घेणार आहेत. जेणेकरुन या प्रकरणात पुढे काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय बैठकीत घेतला जाईल. याशिवाय, बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठीच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीबाबतदेखील चर्चा पार पडणार आहे. पुढील 15 दिवसांत प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Narhari Zirwal: नरहरी झिरवळ कोणत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडले?

राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पैसे घेताना रंगेहाथ पकडले होते. या घटनेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. राजेंद्र ढेरंग यांनी एका औषध दुकानदाराचा निलंबित परवाना पुन्हा देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. यापैकी 35 हजार रुपये स्वीकारताना राजेंद्र ढेरंग एसीबीच्या जाळ्यात सापडले होते. त्यामुळे या खात्याचे मंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांच्या मंत्रि‍पदावर टांगती तलवार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आणखी वाचा

नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण, आदिवासी संमेलनाला गेलेच नाहीत, लाचखोरी प्रकरणामुळे प्रचंड कोंडी

आणखी वाचा

Comments are closed.