पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडियाचा ‘स्पेशल प्लॅन’! सामन्यानंतर अक्षरने केला खुलासा

भारताने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण केली. गतविजेत्या संघाने रविवारी (१५ फेब्रुवारी) पाकिस्तानला ६१ धावांनी पराभूत केले. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताने आतापर्यंत पाकिस्तानला ९ पैकी ८ सामन्यात मात दिली आहे. आशिया कप २०२५च्या वेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानशी कोणतेही वैर नाही असे म्हटले होते. आता उपकर्णधार अक्षर पटेलनेही असेच काही म्हटले आहे.
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. तो संपल्यावर अक्षर म्हणाला, “पाकिस्तानविरुद्धचा सामना आणि त्यावेळी असलेले वातावरण यामुळे भारतीय संघाला त्रास झाला नाही. माझे आणि सर्वांचे लक्ष नियोजित केलेल्या प्रकारे सामन्यात कामगिरी करण्यावर होते.” या सामन्यात त्यानेही २ विकेट्स घेतल्या. त्याने बाबर आझम आणि उस्मान खान यांना बाद केले होते.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अक्षर म्हणाला, “भारतीय फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानी गोलंदाज जे काही होते, त्याबाबत आम्ही विचार केला नाही. आम्ही ज्याप्रकारे प्लानिंग केले, तेच पूर्ण करण्यावर जोर दिला. मग आम्ही बॅटींग करत असो वा बॉलिंग. त्यावेळी आम्ही पहिली बॉलिंग करणार असू तर केवळ विकेट कशी काढली जाईल याचा विचार करतो.”
“आम्ही शत्रू, वैर असे काही विचार करत नाही. आम्ही एका संघाविरुद्ध खेळत आहोत आणि तेव्हा केवळ क्रिकेटवरच लक्ष केंद्रित असते. जेव्हा मी खेळतो तेव्हा मी कशाचा विचार करत नाही. मी पाकिस्तानला बाकी संघाविरुद्ध जसे खेळायचो तसेच खेळतो,” असेही अक्षर पुढे म्हणाला.
या सामन्यासाठी प्रेक्षकांची संख्या पाहिली तर भारतीय चाहते सर्वाधिक दिसले. हा सामना श्रीलंकेत जरी खेळला गेला, तरी भारतीय चाहत्यांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला. भारताने २०२५मध्ये चार वेळा पाकिस्तानला पराभूत केले आहे. आशिया कपमध्ये तीनदा आणि २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकदा पराभूत केले आहे.
Comments are closed.