IND vs PAK: कुलदीप-सूर्याच्या वादाच्या सर्व चर्चांना सूर्याने विजयानंतर एका ‘रील’ने दिला पूर्णविराम!

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला. टी-20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धचा हा भारताचा आठवा विजय ठरला आणि या विजयामुळे टीम इंडियाने ‘सुपर-8’ मध्ये दिमाखात प्रवेश केला. मात्र, या एकतर्फी विजयानंतरही मैदानातील एका घटनेमुळे कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) नाराज दिसला.

पाकिस्तानचा शेवटचा फलंदाज उस्मान तारिकला हार्दिक पांड्याने बाद केले. पण सामना संपल्यानंतर मैदानावर हार्दिक पांड्या, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात थोडा वाद होताना दिसला.

व्हिडिओमध्ये खेळाडू एकमेकांना इशाऱ्याने काहीतरी सांगताना दिसले, ज्यामुळे तिलक वर्मा काहीसा काळजीत पडलेला दिसला, तर रिंकू सिंगने सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व पाहून चाहत्यांच्या मनात शंका आली की भारतीय संघात काही वाद सुरू आहे का?

वादाचे मुख्य कारण म्हणजे, हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) गोलंदाजीवर कुलदीप यादवने बाउंड्री लाईनवर उस्मान तारिकचा कॅच सोडला होता. ही खराब फिल्डिंग पाहून हार्दिक आणि सूर्या दोघेही संतापले होते. सामना जिंकल्यानंतर हस्तांदोलन करतानाही सूर्या कुलदीपला रागावताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

चर्चा वाढत असल्याचे पाहून 16 फेब्रुवारीच्या संध्याकाळी कर्णधार सूर्याने कुलदीपसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, राग सोडून दे भाऊ” (गुस्सा छोड़ दो भाई). या व्हिडिओमध्ये सूर्या कुलदीपला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. या एका पोस्टमुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण खेळीमेळीचे असल्याचे स्पष्ट झाले आणि चाहत्यांच्या सर्व शंका दूर झाल्या. पाकिस्तानला हरवून भारतीय संघ आता कोलंबोतून मायदेशी परतला असून, त्यांचा पुढचा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.

Comments are closed.