‘या’ बाबतीत टीम इंडियाची स्थिती पाकिस्तान-कॅनडापेक्षाही वाईट! टी20 वर्ल्ड कपमध्ये चकित करणारी कामगिरी समोर

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी सुपर-८चे संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. यामधील भारत आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांचे चारही साखळी सामने जिंकले आहेत. यावरून दोन्ही संघ किती ताकदवान आहेत, याचा अंदाज येतो.
आता सुपर-८मध्ये स्पर्धा तगडी असणार आहे, कारण सुपर-८मध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेशी होणार आहे. यादरम्यान चिंता वाढवणारी भारताबद्दलची एक बाब पुढे आली आहे, ज्यामुळे गतविजेत्या संघाचे जिंकणे अवघड झाले आहे. भारताचे खेळाडू धावा करत आहेत, विकेट्स घेत आहेत आणि सामनाही जिंकत आहेत, मात्र एक गोष्ट जी भारताला पुन्हा विश्वविजेते होण्यापासून रोकण्याची शक्यता आहे.
सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात भारताच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्न निर्माण होत आहेत. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत ९ झेल सोडले आहेत, दुसऱ्या संघांशी तुलना केली असता हा आकडा फारच मोठा आहे. आयर्लंडने १० झेल सोडले असून बाकी संघांनी भारतापेक्षा उत्तम क्षेत्ररक्षण केले आहे. भारताचा संघ सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते, पण ही एक कमजोर कडी समोर आली आहे.
मागील १२ ते १८ महिन्यांमधील भारताची झेल पकडण्याची सरासरी ७० टक्केच्या खाली आली आहे. भारताने प्रत्येक सामन्यांमध्ये २-३ झेल सोडले आहेत. भारताने नुकतेच नेदरलॅंड्सविरुद्धही झेल सोडले होते. ज्यामध्ये शेवटच्या षटकात एक झेल घेताना कर्णधार सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांच्यात धडक झाली, मात्र दोघांना काही झाले नाही हे चांगले झाले. त्याच्याच पुढच्याच चेंडूवर तिलक वर्मानेही झेल सोडला. या सामन्यात भारताने तब्बल ५ झेल सोडले. यामुळे भारताने केवळ १७ धावांनीच हा सामना जिंकला.
क्रिकेटमध्ये इंग्रजीत म्हणतात ना ‘कॅचेस विन मॅचेस’. यामुळे भारताला आता फलंदाजी-गोलंदाजी सरावाबरोबर क्षेत्ररक्षणाचा चांगलाच सराव करावा लागणार आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि कॅनडाचे क्षेत्ररक्षण तसे चांगले नाही, मात्र एवढे वाईट पण नाही. सुपर-८मध्ये भारताचे विरोधी संघ पाहता छोट्या-छोट्या चुकाही सामन्याचा निकाल बदलू शकतात.
टी२० विश्वचषक २०२४चा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पाहिला तर सूर्यकुमारने घेतलेला डेविड मिलरचा झेल भारतासाठी चांगलाच फायद्याचा ठरला, कारण संघाने दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकले. यामुळे भारताला क्षेत्ररक्षण विभागात सरस कामगिरी करावी लागणार आहे.
सुपर-८मध्ये भारताचा पहिला सामना २२ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे.
Comments are closed.