उदय सामंत अन् ठाकरेंच्या वैभव नाईकांचं एकत्र जेवण; रोहित पवारांच्या भूमिकेवरही बोलले उद्योगमंत्
उदय सामंत आणि वैभव नाईक: उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक (Vaibhav Naik) हे एकत्र स्नेहभोजन करताना दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र ही भेट पूर्णपणे वैयक्तिक असल्याचे सांगत उदय सामंत यांनी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले. चिपळूण येथील शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्न समारंभानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते. “आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत. त्यामुळे मित्र म्हणून भेटलो आणि एकत्र जेवलो,” असे देखील उदय सामंत यांनी म्हटले आहे.
उदय सामंत म्हणाले की, आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी एकत्र आलेलो आहोत. हा राजकारण विरहित कार्यक्रम आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई देखील येथे उपस्थित आहेत. पालकमंत्री म्हणून मी देखील उपस्थित आहे. वैभव नाईक हे माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. राजकारणापलीकडे आमची मैत्री आहे. आम्ही मैत्री राजकारणात आणली नाही.
Uday Samant and Vaibhav Naik: ते शिवसेनेत आले तर स्वागतच : उदय सामंत
आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतो, हाच आदर्श अनेकांनी घेणं गरजेचं आहे. आम्ही एकत्र जेवायला बसलो याचा अर्थ ते आमच्या शिवसेनेत आले असा होत नाही. ते शिवसेनेत आले तर स्वागतच आहे. प्रवेशाची चर्चा पुरणपोळी किंवा मोदक खाताना होत नाही. त्याला वेगळी बैठक करावी लागते, वेळ आली तर ती बैठक करू, असे त्यांनी म्हटले आहे.
Uday Samant on Rohit Pawar: रोहित पवारांच्या भूमिकेवरही बोलले उद्योगमंत्री
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी झालेला विमान अपघात हा वैमानिकाचा वापर करून घडवून आणलेला घातपात असू शकतो, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. याबाबत विचारले असता उदय सामंत म्हणाले की, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते तपास यंत्रणेला देतील, सरकारला देतील. जय पवार आणि रोहित पवार यांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, याची सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.