दुर्गम भागांत बाल, मातामृत्यू ; नवीन भरतीमध्ये डॉक्टरांची पहिली नियुक्ती आदिवासी भागांमध्ये होणार
दुर्गम व आदिवासी भागांमध्ये वैद्यकीय सुविधांअभावी माता व बालमृत्यूंच्या प्रमाणात वाढ झाल्याने राज्य शासनाचे धाबे दणाणले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून नवीन भरती झालेल्या डॉक्टरांची नियुक्ती आदिवासी भागांमध्ये करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे बिगर आदिवासी भागांमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांनाही यापुढे आदिवासी भागांमध्ये पाठवले जाणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने नवीन पदभरतीत ‘ट्रायबल फर्स्ट’ धोरण लागू लागू केले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवीन पदभरती करताना व सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती देऊन तेथील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यानंतरच बिगर आदिवासी भागातील पदे भरण्यात येणार आहेत. आदिवासी भागात नियुक्त वैद्यकीय अधिकाऱयांना तीन वर्षांनंतर बदलीसाठी विनंती करता येईल.
Comments are closed.