भाजपने आपल्या शहराला काय दिले?… विनाश! कांदळवनांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडसाठी 45 हजार तिवरांची कत्तल करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांना समुद्राच्या अजस्त्र लाटांपासून वाचवणाऱ्या कांदळवनांवर कुऱ्हाड चालवण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही एक्स पोस्टद्वारे हा मुद्दा उपस्थित करत भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे. भाजप सरकारने आपल्या शहराला विनाश दिल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर माध्यमात आलेल्या वृत्तांची कात्रणे शेअर करत भाजप सरकावर हल्ला चढवला. भाजप सरकारने आपल्या शहराला काय दिले… विनाश. स्वच्छ हवेसाठी 2047 पर्यंत वाट पाहा. मुंबई क्लायमेटच्या एका दिवसानंतरच भाजप सरकार पुन्हा आपल्या मूळ रूपावर आले आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

45,000 कांदळवने (मँग्रोव्हज) कापली जाणार आहेत. हवेची गुणवत्ता (AQI) अत्यंत खालावलेली आहे. बिल्डर मोकाट सुटले असून झाडांची कत्तल करत आहेत. आमचे 226 एकरचे खुले उद्यान आता कार पार्किंगमध्ये बदलले जात आहे. व्याघ्र प्रकल्पांमध्ये खाणकामास परवानगी देण्यात आली आहे. वन्यजीव अभयारण्यातील 5,00,000 झाडे कापली जाणार. यासाठी परवानग्याही दिल्या गेल्या आहेत, असे आदित्य ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

Comments are closed.