विराटनंतर आता सूर्यकुमार यादव संजय मांजरेकरांच्या निशाण्यावर! दमदार फलंदाजीनंतरही ‘या’ गोष्टीवर व्यक्त केली नाराजी

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांना अलीकडेच विराट कोहलीवर केलेल्या टिप्पणीमुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता त्यांनी टीम इंडियाचा विद्यमान टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबाबत एक विधान केले आहे. सध्या सुरू असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेविरुद्ध भारताचे विकेट्स लवकर पडल्यानंतर, ‘डिफेन्सिव्ह मोड’मध्ये (बचावात्मक पवित्रा) गेल्याबद्दल संजय यांनी सूर्यावर टीका केली आहे.

​इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये संजय मांजरेकर म्हणाले: ‘सूर्यकुमार यादवमध्ये मला असं काहीतरी दिसतंय जे मला फारसं आवडत नाहीये. वानखेडेवर अमेरिकेविरुद्ध भारताची धावसंख्या ७७/६ असताना सूर्यकुमारला आपला खेळ बदलावा लागला, जो त्याने उत्तमरीत्या बदलला. त्याने खेळ थोडा संथ केला आणि नंतर फटकेबाजी करत शानदार धावसंख्या उभारली, तो ‘प्लेयर ऑफ द मॅच’ही ठरला. पण तेव्हापासून मला वाटतंय की तो हे थोडं जास्तच करतोय. पाकिस्तानविरुद्ध जेव्हा भारताने काही विकेट्स गमावल्या, तेव्हा त्याने खरोखरच आपली फटकेबाजी पूर्णपणे थांबवली होती.’

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर एकत्र संघर्ष करताना दिसत आहे. वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमारने ४९ चेंडूत ८४ धावा करून संघाला सावरले होते. मात्र, त्यानंतर नामिबियाविरुद्ध त्याने १३ चेंडूत १२ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध त्याने २९ चेंडूत ३२ धावा, तर नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात २८ चेंडूत ३४ धावा केल्या आहेत.

​सूर्यकुमारची २०२५ मधील आंतरराष्ट्रीय टी-२० कामगिरी खराब राहिली होती; त्याने २१ सामन्यांत एकही अर्धशतक न झळकावता १३.६२ च्या सरासरीने केवळ २१८ धावा केल्या होत्या. मात्र, ३५ वर्षांच्या या खेळाडूने २०२६ ची सुरुवात जोमाने केली असून, न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत २४२ धावा करून तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली भारत २२ फेब्रुवारीला अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला ‘सुपर ८’ सामना खेळणार आहे.

Comments are closed.