नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाचा ‘फुसका’ बार, ICC च्या स्पर्धेत अहमदाबादमध्ये भारत पुन्हा प

दक्षिण आफ्रिकेने भारताला हरवले सुपर 8 ICC T20 विश्वचषक 2026 : अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम आणि भारतीय चाहत्यांचे तुटलेले हृदय… हे समीकरण जणू आता पाचवीलाच पुजलंय. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील त्या पराभवाच्या आठवणी अजून पुसल्या गेल्या नव्हत्या, तोच याच मैदानावर आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 धावांनी धुव्वा उडवला. या पराभवासोबतच भारताची सेमीफायनलची वाट बिकट झाली असून, अहमदाबादचे मैदान भारतीय संघासाठी ‘अनलकी’ ठरत असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे.

सुरुवातीला बुमराह-अर्शदीपचा कहर

सुपर-8 सामन्यात भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या 20 धावांवर संघाने तीन महत्त्वाचे बळी गमावले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने क्विंटन डी कॉकला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) कर्णधार एडेन मार्करमला केवळ 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चौथ्या षटकात पुन्हा बुमराहने रयान रिकेल्टनला 7 धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला.

डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलरचा तांडव

यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करत संघाचा डाव 1000 धावांच्या पार नेला. मात्र, शिवम दुबेने ब्रेविसला बाद करत ही जोडी फोडली. ब्रेविसने 29 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी केली, यात 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

भारतासमोर 188 लक्ष्य

दरम्यान, डेव्हिड मिलरनेही तुफानी फलंदाजी करत 35 चेंडूत 63 धावा केल्या. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार होते. अखेरीस त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले. शेवटच्या षटकांत ट्रिस्टन स्टब्सने 24 चेंडूत नाबाद 44 धावांची झंझावाती खेळी करत संघाचा डाव 187 धावांपर्यंत पोहोचवला. त्याने 1 चौकार आणि 3 षटकार लगावले. भारताकडून बुमराहने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव रोखला.

पॉवरप्लेमध्ये 31 धावांवर 3 मोठे धक्के…

188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेच्या 6 षटकाअखेर भारताने 31 धावांवर आपले 3 महत्त्वाचे फलंदाज गमावले आहेत. सलामीवीर ईशान किशन शून्यावर बाद झाला, तर तिलक वर्मा (1) आणि अभिषेक शर्मा (15) हे देखील झटपट माघारी परतले. त्यानंतर या पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरदेखील बाद झाला असून त्याने 11 चेंडूत 11 धावा केल्या. सूर्यकुमार यादव काही वेळ स्थिर राहिला, तर हार्दिक पांड्या 18 धावा करून बाद झाला. 8 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या 88 पर्यंत पोहोचली.  टीम इंडियासाठी, फक्त शिवम दुबे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर टिकू शकला. त्याने 37 चेंडूत 42 धावा केल्या. पण टीम इंडियाला फक्त 111 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेने भारताला 76 धावांनी हरवून धक्का दिला. मैदान भारतीय होते, चाहते भारतीय होते आणि परिस्थिती टीम इंडियाला अनुकूल होती, परंतु दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला.

सुपर-8ची समीकरणे बदलली

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 च्या गुणतालिकेत (Points Table) आपले खाते उघडले असून 2 गुण पटकावले आहेत. भारतासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतासाठी पुढचे सर्व सामने ‘करो या मरो’ अशा स्थितीतील असतील.

26 फेब्रुवारी – झिम्बाब्बे विरुद्ध, चेन्नई

1 मार्च – वेस्ट इंडिज विरुद्ध, कोलकाता

हे ही वाचा –

Smriti Mandhana : तुमच्या भावनांची कोणाला पडलीये…; स्मृती मानधानाची ‘ती’ पोस्ट अन् क्रिकेटविश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.