भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हेड-टू-हेड रेकॉर्ड, टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाचे वर्चस्व? वाचा सविस्तर

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सुपर-८चे सामने सुरू आहेत. यामध्ये आज (१ मार्च) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगणार आहे. उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. दोन्ही संघ टी२० विश्वचषकात आधीही भिडले आहेत. यामध्ये कोण वरचढ राहिले हे जाणून घेऊ.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात टी२० विश्वचषकाचे आतापर्यंत ४ सामने खेळले गेले. यामध्ये तीन वेळा वेस्ट इंडिज जिंकला असून भारताला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. यामुळे टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिजने भारतावर ३-१ अशी आघाडी घेतली आहे.

दोन्ही संघ २००९मध्ये पहिल्यांदा टी२० विश्वचषकात समोर आले. त्या सामन्यात भारताने १५३ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजने तो सामना ७ विकेट्सने जिंकला. त्यानंतर पुन्हा २०१०मध्ये भारत-वेस्ट इंडिज आमने-सामने आले. ब्रिजटाऊनमध्ये झालेला तो सामना वेस्ट इंडिजने १४ धावांनी जिंकला होता.

टी२० विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ दोन पराभव झाल्यानंतर भारताने २०१४मध्ये त्याचा बदला घेतला. ढाकामध्ये झालेल्या त्या सामन्यात भारत गोलंदाजी सरस ठरली. त्या सामन्यात वेस्ट इंडिज २० षटकात ७ विकेट्स गमावत १२९ धावाच करु शकला. ते लक्ष्य भारताने शेवटच्या षटकात ७ विकेट्स शिल्लक राखत गाठले. हा सामना भारताला जिंकणे अत्यवश्यक होते कारण संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता.

२०१६ वर्ष कोणताच भारतीय चाहता सहज विसरणार नाही. यावेळी दोन्ही संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना झाला. या सामन्यात भारताने मोठी धावसंख्या उभारली होती, मात्र वेस्ट इंडिजने शेवटच्या षटकात सामना जिंकला आणि पुढे विजेतेपदही जिंकले. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने नाबाद ८९ धावा केल्याने संघाने २० षटकात २ विकेट्स गमावत १९२ धावसंख्या केली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून लेंडिल सिमन्सने नाबाद ८२, आंद्रे रसेलने नाबाद ४३ धावा केल्या. तसेच जॉन्सन चार्ल्सने ५२ धावा केल्या. यामुळे वेस्ट इंडिजने हा सामना २ चेंडू आणि ७ विकेट्स शिल्लक राखत जिंकला होता.

यावर्षी दोन्ही संघात उपांत्य फेरीत कोण जाणार यासाठी सामना खेळला जाणार आहे. वरील कामगिरी पाहता वेस्ट इंडिज संघ जरी वरचढ दिसला असला तरी भारताला कोणत्याही परिस्थितीत आज विजय आवश्यक आहे.

भारतासाठी एक चांगली बातमी म्हणजे कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर भारताने वेस्ट इंडिजला चारही टी२० सामन्यात पराभूत केले आहे. तसेच या दोन्ही संघात आतापर्यंत ३० टी२० सामने खेळले गेले. त्यातील १९ सामने भारताने आणि १० सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णीत राहिला.

Comments are closed.