T20 WC26: वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी चौकार मारल्यावर संजूने फेकले हेल्मेट, आयसीसी करणार कारवाई?

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील रविवार (२ मार्च) भारतीय चाहत्यांसाठी चांगलाच लक्षात राहणार आहे. कोलकातामध्ये झालेल्या त्या सुपर-८च्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ५ विकेट्सने पराभूत केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताला १९६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. संजू सॅमसनच्या उत्तम खेळीमुळे भारताने चार चेंडू शिल्लक राखत लक्ष्य गाठले.
उपांत्य फेरीत आता भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना ५ मार्चला रंगणार आहे. तसेच पहिला उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये ४ मार्चला कोलकातामध्ये खेळला जाणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात संजूने १२ चौकार आणि चार षटकार मारले. त्याने ५० चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. त्याने १९व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर विजयी चौकार मारला आणि भारत जिंकला, यामुळे तो खूप भावूक दिसला. तेव्हा त्याने भावनेच्या भरात हेल्मेट आणि बॅट बाजूला फेकली. नंतर त्याने दोन्ही हात उंचावत आकाशाकडे पाहत देवाचे आभार मानले. त्याचे हे सेलिब्रेशन चांगलेच व्हायरल झाले होते, मात्र त्याच्यासमोर आता या सेलिब्रेशनमुळे अडचण निर्माण झाली आहे.
हेल्मेट फेकत आनंदाचा जल्लोष करणे संजूला जड पडू शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) त्याचवर दंडात्मक कारवाई करू शकते. आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये खेळाडूंसाठी एक नियम आहे. त्यामध्ये मैदानावर हेल्मेट किंवा बॅट फेकणे चुकीचे असून त्या खेळाडूला शिक्षाही होऊ शकते. अशा प्रकारात खेळाडूची सामन्याची फि कपात होऊ शकते किंवा डिमेरीट पॉइंट्सही मिळू शकतात. तसेच त्या खेळाडूला काही काळासाठी निलंबित देखील केले जाऊ शकते.
आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टचा उद्देश केवळ नियमांचे पालन करण्यासाठी नाही तर खेळाडू, पंच आणि मैदानावर उपस्थित असलेल्या अन्य लोकांच्या सुरक्षेसाठीही महत्वाचे आहे. हेल्मेट किंवा बॅट फेकल्याने कोणालाही दुखापत होऊ शकते. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही नियम आहेत.
संजूचे हे सेलिब्रेशन पाहून अनेकांना नक्कीच आवेश खानची आठवण आली असेल. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२३च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या आवेशने बेंगलोर रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध एक विकेटने विजय मिळवल्यावर हेल्मेट फेकले होते. तेव्हा त्याने आचारसंहितेने उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले आणि त्याला फटकारले होते.
संजूच्या उत्तम खेळीमुळे भारताने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आता त्याच्या या व्हायरल सेलिब्रेशनवर आयसीसी काय ऍक्शन घेते, याकडे लक्ष असले. त्याने केलेले ते सेलिब्रेशन भावनेच्या भरात केले होते असे मानले जाईल की आयसीसी त्याच्यावर नियामानुसार कारवाई करेल. काही दिवसांतच याची पुष्टी होईल
Comments are closed.