माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी जनतेचा व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी, शरद पवार यांचे भावनिक पत्र

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी प्रत्यक्ष जाऊन उमेदवारी अर्ज भरला नाही. त्या ऐवजी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन केली प्रक्रिया पूर्ण केली.

शरद पवार यांनी निवडणूकीचा अर्ज भरल्यानंतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच सर्व मित्रपक्षांचे ऋणी असल्याचे म्हटले आहे. ”१९६७ पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, ”१९६७ मध्ये प्रथम महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्याने काम करत असताना लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. तसेच केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मला मिळाली. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ राहिले आहे. महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे”, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

”महाराष्ट्राने मला दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझ्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल. सध्या डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे शक्य नसल्याने या पत्रकाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवत आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेम, पाठिंबा आणि विश्वास हेच माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील”, असेही ते म्हणाले.

Comments are closed.