IND vs ENG, ICC T20 World Cup: सरशी भारताची, झुंज इंग्लंडची!


IND vs ENG, ICC T20 विश्वचषक: 18 चेंडूंत 45 धावा, मग 12 चेंडूंत 39 धावा आणि नंतर 6 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज, तरीही सामन्यात बाजी मारणार कोण…? हे कळत नव्हतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यातला खेळ पाहून टी-ट्वेन्टीचा थरार नेमका कसा असतो? याचं दर्शन घडलं. त्यातही भारतानं बाजी मारली आणि अवघ्या भारतात आनंदोत्सव सुरू झाला.

भारताने 253 चा महाकाय स्कोअर उभा करूनही इंग्लंडचे प्रयत्न अवघ्या सात धावांनी अपुरे पडले. याबद्दल इंग्लंडचीही पाठ थोपटावी लागेल.जेकब बेथेल नावाच्या प्रतिभावान युवा खेळाडूने इंग्लंडच्या आव्हानातली धुगधुगी कायम ठेवत सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला. बटलर आणि ब्रुक हे दोन अनुभवी फलंदाज बाद झाल्यावर त्याने जी जिगर दाखवली त्याला तोड नाही. तो मैदानात चौफेर चेंडू टोलवत असताना भारतीय फॅन्सच ब्लडप्रेशर आणि हृदयाची धडधड कशी होती, याचा अनुभव आपण घेतलाच. खेळाच्या तिसऱ्या अंगातला अर्थात क्षेत्ररक्षणातला आपला उंचावलेला दर्जा आज आपल्याला सामना जिंकून देणारा ठरला. अक्षर पटेलने घेतलेला एक रनिंग कॅच तर दुसरा बाऊंड्रीवर प्रचंड प्रसंगावधान दाखवत केलेला रिले कॅच केवळ अफलातून. यानिमित्ताने अक्षरने गेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये बाऊंड्रीवर मार्शचा घेतलेल्या एकहाती कॅचची आठवणही ताजी झाली. अक्षरची मैदानातील चपळाई, त्याच्या उंचीमुळे तो कव्हर करत असलेलं अंतर आणि त्याचं उंच कॅचेस पकडताना ते नेमके हेरण्यासाठी धावण्याचं कसब केवळ अफलातून आहे. तिलक वर्मानेही अतिशय दबावाच्या क्षणी घेतलेला सॅम करनचा कॅच सोन्याच्या मोलाचा. त्याच वेळी हार्दिकचा अख्खा स्पेल खास करून त्याने टाकलेली १९ वी ओव्हर आणि त्याआधीच्या बुमराच्या 16 वी आणि 18 वी ओव्हर याचंही कौतुक व्हायला हवं. या तिन्ही षटकांमध्ये सामना भारताच्या बाजूने यायला सुरुवात झाली. अखेरच्या षटकात चेंडू शिवम दुबेच्या हाती सोपवणं हा एक प्रकारे कॅलक्युलेटेड गॅम्बल होता. मला धोनीने जोगिंदर शर्माच्या हाती 2007 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये लास्ट ओव्हर सोपवली होती, त्याची आठवण झाली. अर्थात अखेरच्या षटकात 30 धावा, म्हणजे किमान पाच षटकार ठोकावे लागले असते. त्यात हार्दिकच्या चपळाईने बेथेल धावचीत झाला आणि इंग्लंडच्या फायनलच्या आशांना भारताने कुलूप लावलं.

जोफ्राने षटकार ठोकले खरे, पण तोपर्यंत भारताच्या हातात विजयाची चावी आली होती.गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचं कौतुक करतानाच सॅमसनच्या भन्नाट खेळीबद्दल त्याची पाठ थोपटावी लागेल. एका बहुमोल जीवदानाचा फायदा उठवत तो ईडन गार्डन्सवरचीच जणू खेळी पुढे करत होता. तीच शिस्त, त्याच्या शैलीतले तेच देखणे फटके. शतक हुकल्याची रुखरुख त्याला लागली असेल. पण, तेव्हा गियर बदलण्याची गरजच होती. तो संघभावनेनेच खेळला. अर्थात शिवम दुबे, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या यांच्या छोट्या छोट्या मजल्यांनी आपण 253 च्या टोलेजंग इमारतीची टेरेस गाठली. इथे अभिषेक शर्माने खेळलेल्या आततायी फटक्याचा त्याला पश्चाताप होईल अशी अपेक्षा करुया. गरज नसताना रनरेट कव्हर झालेला असताना, समोरून संजू सॅमसन शांतपणे घाई न करता खेळ असं सांगत असताना अभिषेकने आपली विकेट बहाल केली. आता फायनलमध्ये ही चूक त्याने करू नये अशी अपेक्षा करुया. फायनलमध्ये किवी समोर आहेत. दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या टीमला एकहाती सामन्यात त्यांनी धूळ चारत फायनल गाठलीय. तेव्हा आणखी एक रोमहर्षक सामना होईल, आणि भारताचा टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या सलग दुसऱ्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा बाळगूया.

Comments are closed.