बीसीसीआयने टी20 चॅम्पियन्सवर पाडला पैशांचा पाऊस, ‘इतक्या’ कोटींची बक्षिस रक्कम केली जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुन्हा एकदा भारतीय पुरुष संघासाठी तिजोरी उघडली आहे. टी२० विश्वचषक २०२६ जिंकल्याबद्द्ल बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी मोठ्या रकमेचे बक्षिस जाहीर केले आहे. भारताने ८ मार्चला अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा दारुण पराभव केला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या त्या सामन्यात भारत ९६ धावांनी जिंकला होता. त्यामुळेच मंगळवारी (१० मार्च) बीसीसीआयने बक्षिस रक्कम जाहीर केली.

बीसीसीआयने मीडियामध्ये सांगितले की आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये संघाने उत्तम कामगिरी करत पुन्हा एकदा विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे बोर्ड त्यांच्यासाठी १३१ कोटी रुपयांची बक्षिस रक्कम जाहीर करत आहे. भारताने हा विश्वचषक जिंकल्याबरोबर अनेक विक्रमांना गवसणी घातली. संघ तीन वेळा टी२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला. घरच्या मैदानावर विजेतेपद जिंकणे आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकणे अशा अनेक मोठ्या विक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे.

भारताने या स्पर्धेत सर्व साखळी सामने जिंकत धमाक्यात सुपर-८मध्ये प्रवेश केला होता. त्यामधील पहिल्याच सुपर-८ सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. नंतर वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध सलग दोन सुपर-८ सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तेथे इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत पुन्हा एकदा टी२० चॅम्पियन ठरला.

या स्पर्धेत भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांचे योगदान म्हणून बीसीसीआयने त्यांचे कौतुक केले आहे.

Comments are closed.