एपस्टीन फाईलमध्ये नाव आल्याने मोदी पूर्णपणे सरेंडर! हर्षवर्धन सपकाळ, प्रकाश आंबेडकर यांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाईल्समध्ये आल्याने देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले असून पंतप्रधान पूर्णपणे अमेरिकेच्या दबावाखाली काम करत आहेत, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि आरएसएसला जाब विचारण्यासाठी येत्या 23 मार्च रोजी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्त धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यामुळे पंतप्रधान मोदींनी स्वतःला अमेरिकेला सरेंडर केले आहे. यामुळे केवळ आर्थिकच नव्हे, तर देशाचे राजकीय सार्वभौमत्वही विकले गेले आहे. एपस्टीन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नक्की काय दडलेले आहे, ज्यामुळे ते अमेरिकेसमोर इतके झुकले आहेत? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच अशा व्यक्तीला तुम्ही पंतप्रधान पदावर कसे काय ठेवू शकता? याचा जाब विचारण्यासाठी आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढणार जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण आता अमेरिका नियंत्रित करत आहे. हिंदुस्थान-अमेरिका व्यापारी करारातील अटींनुसार हिंदुस्थानचे धोरण अमेरिकेच्या हितानुसार ठरवले जाईल, यावर सरकारने स्वाक्षरी केल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच रशियाकडून मिळणारे स्वस्त तेल सोडून अमेरिकेच्या दबावाखाली हिंदुस्थान महागडे तेल खरेदी करत आहे, ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे, असेही ते म्हणाले.

मध्यमवर्गीय जनतेने आता तरी खोट्या जाती आणि धर्माच्या बुरख्यातून बाहेर यावे. देशाचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता धोक्यात आली आहे, त्यामुळे या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.

ही षंढांची शांतता आहे; एपस्टीन फाईलमधील गौप्यस्फोटामुळे काहींनी युद्ध पुकारलं, तर काहींनी मौनात जाणं पसंत केलं! – संजय राऊत

Comments are closed.