गोळी मारून टाका त्या माणसाला…; पाकिस्तानी दिग्गजाचा संताप अनावर; वक्तव्याने क्रिकेटविश्व हादरलं
पाकिस्तानच्या मानहानीकारक पराभवानंतर बासित अलीने मोठे वक्तव्य केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मीरपूर येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 114 धावांवर गुंडाळला. हे लक्ष्य बांगलादेशने फक्त 15 षटकांत पूर्ण केले. या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी संघाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित करत व्यवस्थापनाला परिस्थितीची अजिबात जाण नसल्याचा आरोप केला.
पाकिस्तानच्या पराभवानंतर बासित अली यांचा संताप
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका करत म्हटले,
“सर्वप्रथम त्या व्यक्तीला गोळी घाला ज्याने पॉवरप्लेच्या 10 षटकांत किमान 60 धावा करण्याचे टार्गेट दिले. त्याने आयुष्यात कधी मैदानावर क्रिकेट खेळलेलेच नाही. इथल्या परिस्थिती कशा आहेत हे त्याला दिसत नाही का? भारतासारखी मजबूत टीमदेखील बांगलादेशमध्ये हरली आहे, हे त्याला माहीत नाही का?”
कामरान अकमलचीही तीव्र नाराजी
पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल यानेही संघाच्या कामगिरीवर कठोर शब्दांत टीका केली. तो म्हणाला, “हा सामना पाहताना असे वाटत होते की एक संघ आंतरराष्ट्रीय स्तराचा आहे आणि दुसरा जणू काही क्लब टीम आहे जी वर्ल्ड कपपूर्वी सराव सामना खेळत आहे. मी शपथ घेऊन सांगतो, क्लब क्रिकेटमध्येही इतकी वाईट फलंदाजी पाहायला मिळत नाही. क्लबमधील खेळाडूही इतके खराब खेळत नाहीत.”
4 खेळाडूंना एकाचवेळी संधी देण्यावरही टीका
बासित अली यांनी पाकिस्तान संघात एकाच वेळी चार खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्याच्या निर्णयावरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “युवा खेळाडूंना संधी द्यावी ही चर्चा थांबवा. जगातील क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा युवा खेळाडू येतो तेव्हा तो पूर्ण तयारीनिशी येतो आणि प्रभाव टाकतो. आमच्या खेळाडूंनी हे समजून घ्यायला हवे की हे स्थानिक क्लबचे मैदान नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैदान आहे.”
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.