सत्ताधाऱ्यांनी राज्य विकायला काढले आहे आणि राज्याचे रुपांतर वाळवंटात केले जात आहे, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राज्यातील विविध विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडे आणि नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होत असल्याचा आरोप केला.
आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मुंबईत एका पुलासाठी तब्बल 45,000 कांदळवनाची झाडं तोडली जात आहेत, तर गोल्फ कोर्ससाठीही खारफुटीची झाडं नष्ट केली जात आहेत. गडचिरोलीतील घोडाझरी वन्यजीव अभयारण्यात तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात खाणकाम सुरू असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
तसेच ठाणे जिल्ह्यातील तानसा वन्यजीव अभयारण्यात सुमारे 5 लाख झाडे तोडली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यातील वेताळ टेकडी सपाट करून तिथे बोगदा, मेट्रो आणि उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्यातील नदीकाठ विकास प्रकल्पामुळे संपूर्ण नदीकिनाऱ्यावर परिणाम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूरमधील अजनी वन परिसरात पर्यायी जागा उपलब्ध असतानाही मल्टीमोडल स्टेशनसाठी जंगल नष्ट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
नवी मुंबईत F4 शर्यतीसाठी 70 झाडे तोडण्यात आल्याचे त्यांनी म्हटले, तर नाशिकमधील तपोवन जंगलात बांधकाम व्यावसायिकांना लाभ देण्यासाठी जंगलाचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“आमच्यापैकी काहीजण या सगळ्याविरोधात लढत आहोत, पण अधिक लोकांनी पुढे यायला हवे. सत्ताधाऱ्यांनी राज्य विकायला काढले आहे आणि राज्याचे रुपांतर वाळवंटात केले जात आहे,” असा इशारा त्यांनी दिला. मार्च महिन्यातच उष्णता वाढल्याचा आणि स्वच्छ हवा मिळत नसल्याचा उल्लेख करत त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी जागरूक होण्याचे आवाहन केले.

Comments are closed.