सैनिकांना 'प्रहार' मशीन गन मिळणार
अदानी डिफेन्सकडून लष्कराला 2,000 मशीन गन सुपूर्द : 1 किमी अंतरावरून शत्रूंना ठार मारण्यास सक्षम
वृत्तसंस्था/ग्वाल्हेर
लष्कराची मारक क्षमता वाढवण्यासाठी एका प्रमुख संरक्षण कंपनीने शनिवारी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत उत्पादित केलेल्या 2,000 ‘प्रहार’ लाईट मशीन गनची (एलएमजी) पहिली तुकडी भारतीय लष्कराला सुपूर्द केली. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने ग्वाल्हेर येथील आपल्या स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्समध्ये ही शस्त्रs तयार केली आहेत. भारताचे उद्दिष्ट आपल्या सीमांवर, विशेषत: प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) आणि नियंत्रण रेषेवर (एलओसी) मजबूत संरक्षण तैनाती राखणे आहे. ही नवीन शस्त्रs लष्कराची मारक क्षमता आणि एकूण परिचलन क्षमता आणखी वाढवतील. भारतीय लष्करी जवानांच्या हाती ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘प्रहार’ लाईट मशीन गन दिसणार आहेत.
2000 एलएमजी गनची पहिली तुकडी नुकतीच लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ‘प्रहार’ या लाईट मशीन गनचे वजन साडेसात ते आठ किलो असून तिचा प्रभावी पल्ला 1 किलोमीटर आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रहार’च्या बॅरलची लांबी 508 मिमी (20 इंच) असून एकूण लांबी 1,100 मिमी आहे. तिचा प्रभावी पल्ला 1,000 मीटर आहे. शनिवारी ग्वाल्हेर येथील कारखान्याच्या आवारात लष्कराला एलएमजी सुपूर्द करण्याचा समारंभ पार पडला. या समारंभाला संरक्षण मंत्रालयाचे खरेदी विभागाचे महासंचालक ए. अंबरासू, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचे सीईओ आशिष राजवंशी आणि कंपनीचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर, अंबरासू आणि इतरांनी एलएमजीच्या पहिल्या तुकडीला घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवला.
प्रहार एलएमजीचे वैशिष्ट्या काय?
इस्रायलमध्ये नेगेव्ह एनजी7 म्हणून ओळखली जाणारी ‘प्रहार’ ही एक अत्यंत शक्तिशाली 7.62 मिमी कॅलिबरची बंदूक आहे. तिचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिचे वजन हे आहे. जवळपास 7.6 किलो वजनाची ही बंदूक, तिच्या श्रेणीतील इतर बंदुकांपेक्षा 20 ते 30 टक्के हलकी आहे. तिच्या लहान आकारामुळे पॅराट्रूपर्सना ती सहजपणे वाहून नेता येते. यामुळे युद्धभूमीवर सैनिकांच्या मारक क्षमतेत लक्षणीय वाढ होईल.
वेळेच्या आधी डिलिव्हरी
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही या मशीन गनची खेप नियोजित वेळेच्या 11 महिने आधीच वितरित करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक (अधिग्रहण) ए. अंबरासू यांनी याचे वर्णन ‘वेळेविरुद्धची शर्यत जिंकणे’ असे केले. कंपनीचे सीईओ, आशिष राजवंशी यांच्या म्हणण्यानुसार, एकूण 40,000 बंदुकांची ऑर्डर असून, ती पुढील तीन वर्षांत पूर्ण केली जाईल. या ग्वाल्हेर युनिटमध्ये दरवर्षी 1 लाख शस्त्रs तयार करण्याची क्षमता आहे.
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल
प्रहार मशीन गन ही केवळ एका शस्त्राची डिलिव्हरी नाही, तर भारताचा एका घटक-उत्पादक कंपनीपासून ‘ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर’ बनण्यापर्यंतचा प्रवास आहे. पिस्तूल, स्नायपर आणि असॉल्ट रायफल आता भारतातच तयार होत असल्यामुळे परदेशी देशांवरील आपले अवलंबित्व कमी होत आहे.
Comments are closed.