25 सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या
राज्य सरकारने सलग दुसऱ्या दिवशी सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. आज एका दिवसात तब्बल पंचवीस सनदी अधिकाऱयांच्या एका फटक्यात बदल्या करून फार मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल केले आहेत. एकाच वेळेस पंचवीस सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज (अकोला) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची बदली महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (मुंबई) डॉ. मंगेश गोंडावले यांची नियुक्ती गोंदियाचे जिल्हाधिकारी, राजापूर उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी जास्मीन यांची बदली कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर महानगर पालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची बदली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त या पदावर झाली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे प्रकल्प संचालक मुंबई (रुसा) डॉ. राजेंद्र भारुड यांची बदली कोल्हापूर महापालिका आयुक्त म्हणून झाली आहे.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली नागपूरचे जिल्हाधिकारी, नागपूर महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांची बदली चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी, गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची बदली पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची नियुक्ती नागपूर महपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची बदली सोलापूरचे जिल्हाधिकारी, अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांची बदली सांगली मिरज कुपवाडा महापालिकेच्या आयुक्त म्हणून झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी सत्कार आणि आता बदली
मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात ई गव्हर्नन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात आलेले कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांची बदली छत्रपती संभाजीनगर पालिकेचे आयुक्त म्हणून झाली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांची बदली नवी मुंबईत जलजीवन मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे.
Comments are closed.