केदारनाथमध्ये बर्फवृष्टी; अटल बोगद्याचा मार्ग बंद.
उत्तर प्रदेशात वीज पडून 5 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, देहराडून
उन्हाळ्याच्या दिवसांत देशाच्या उत्तर आणि पश्चिम राज्यांमध्ये पाऊस, गारपीट आणि हिमवृष्टी होत आहे. शनिवारी झालेल्या हिमवृष्टीनंतर केदारनाथचा संपूर्ण परिसर पांढराशुभ्र झाला आहे. याचदरम्यान रोहतांग खिंडीजवळ मुसळधार हिमवृष्टीमुळे अटल बोगदा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान, लाहौल-स्पितीच्या उंच पर्वतांमध्ये हिमवृष्टी सुरू आहे. हिमाचलची राजधानी शिमला येथेही शनिवारी जोरदार वादळासह हलका पाऊस झाला.
भारतीय हवामान विभागाने 5-6 एप्रिल रोजी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, बिहार, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये गारपिटीची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये वीज पडण्याची शक्यता आहे.
राजस्थानमधील जैसलमेर आणि बिकानेर या वाळवंटी जिह्यांमध्ये शुक्रवारी जोरदार गारपिटीचा तडाखा बसला. अजमेर आणि ब्यावरमध्ये वादळामुळे झाडे उन्मळून पडली. याठिकाणी घरांचे पत्रे आणि शेड उडून पडल्याने लोकांचे नुकसान झाले. या भागात पुढील तीन दिवस असेच हवामान अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशातील कोसिकला धान्य बाजारात 10,000 पोत्यांमध्ये साठवलेला 5,000 क्विंटल गहू पावसात भिजला. याचदरम्यान राज्याच्या विविध भागांमध्ये वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. दिल्ली आणि पंजाबसह 11 राज्यांमध्ये शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. शुक्रवारी मध्य प्रदेशातील 36 जिह्यांमध्ये पाऊस झाला. त्यानंतर शनिवारीही गारपिटीचा फटका बसला.
Comments are closed.