करार होणारच होता, पण…; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं चर्चा फिसकटण्याचं कारण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आखाती देशात कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू झालेली इराण व अमेरिकेमधील 21 तासांची चर्चा निष्फळ ठरली आहे. तब्बल 40 दिवस हे युद्ध सुरू असून ते थांबवण्यासाठी इस्लामाबाद येथे दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान अमेरिका आणि इराण कराराच्या अगदी जवळ पोहोचले होते. मात्र शेवटच्या क्षणी ही संधी हुकली, अशी माहिती इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिली.

अराघची यांनी सोशल मीडियाच्या माध्यमावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, तब्बल 47 वर्षांनंतर इराणने अत्यंत प्रामाणिक हेतूने आणि युद्ध थांबवण्याच्या इराद्याने या चर्चेत सहभाग घेतला होता. आम्ही ‘इस्लामाबाद सामंजस्य कराराच्या’ (MoU) अगदी जवळ पोहोचलो होतो. मात्र अमेरिकेने अचानक आपले लक्ष्य बदलले आणि नवनवीन अटी लादण्यास सुरुवात केली. अमेरिकेने जुन्या चुकांमधून कोणताही धडा घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

या संदर्भात इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनीही आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की, जर अमेरिकेने आपली हुकूमशाही वृत्ती सोडली आणि इराणच्या अधिकारांचा आदर केला, तर कराराचे मार्ग अजूनही मोकळे आहेत. इराण कोणत्याही दबावाखाली न येता सन्मानाने तडजोड करण्यास तयार असल्याचे त्यांनी सूचित केले. तसेच त्यांनी या कठीण चर्चेत सहभागी झालेल्या आपल्या प्रतिनिधी मंडळाचे कौतुक केले.

21 तासांची चर्चा निष्फळ; अमेरिकेच्या अटी इराणने धुडकावल्या, ट्रम्प यांनी पाठवलेले शिष्टमंडळ रिकाम्या हाती परतले

Comments are closed.