पश्चिम बंगाल फेज 1 मोहीम संपली

तामिळनाडूतही थंडावला जागर, 23 ला मतदान

वृत्तसंस्था / कोलकाता, चेन्नई

पश्चिम बंगाल (प्रथम टप्पा) आणि तामिळनाडू येथे विधानसभा निवडणुकांचा जाहीर प्रचार आता थांबला आहे. पश्चिम बंगाल राज्य विधानसभेच्या 294 मतदारसंघांपैकी 152 मतदारसंघांमध्ये, तर तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 मतदारसंघांमध्ये उद्या गुरुवारी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यासाठीची सर्व सज्जता पूर्ण झाली असून मतदान शांततेत आणि निर्भयपणे होईल, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या या फेरीत चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी आसाम आणि केरळ ही दोन राज्ये, तसेच पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश येथे 9 एप्रिललाच मतदान झालेले आहे. आता 23 एप्रिलला पश्चिम बंगालचा प्रथम टप्पा आणि तामिळनाडू येथे मतदान होत आहे.

पश्चिम बंगाल विशेष चर्चेत

विधानसभा निवडणुकांच्या या फेरीत पश्चिम बंगाल हे राज्य विशेष चर्चेत राहिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण अभियाना’ला ममता बॅनर्जी यांनी केलेला तीव्र विरोध, या विरोधामुळे निर्माण झालेली न्यायप्रक्रिया, या राज्यात असलेली निवडणूक हिंसाचाराची परंपरा, मतदारांना भेडसावण्याचे आणि धमकावण्याचे प्रकार, मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आयोजित केलेली आलेली अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था, या साऱ्यांमुळे या राज्यातील ही निवडणूक गाजत आहे.

प्रमुख संघर्ष दोन पक्षांमध्ये

पश्चिम बंगाल राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांमध्येच प्रमुख संघर्ष होत आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या मागच्या निवडणुकीत शून्य जागा निवडून आल्या होता. भारतीय जनता पक्षाने 77 जागा घेऊन प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान मिळविले होते. तृणमूल काँग्रेसने 215 जागा घेत सत्तेची हॅटट्रिक केली होती. यावेळीही हेच दोन पक्ष प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. डावे आणि काँग्रेस यांची स्थिती नाजूकच मानली जाते.

द्रविड पक्षांमध्येच चुरस

तामिळनाडू राज्यात द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अद्रमुक) या दोन द्राविडी पक्षांमध्येच प्रमुख संघर्ष आहे. या दोन पक्षांनी विविध इतर पक्षांची युती केली आहे. भारतीय जनता पक्ष अद्रमुकशी युती करुन निवडणूक संघर्षात आहे. तर काँग्रेसने द्रमुकशी युती केली आहे. 23 एप्रिलला तामिळनाडू येथील मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा द्वितीय टप्पा 29 एप्रिलला असून त्या टप्प्यात 142 जागा आहेत.

मतगणना 4 मे या दिवशी…

आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांची मतगणना 4 मे या दिवशी होणार आहे. त्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व स्थानांमधील चित्र स्पष्ट झालेले असेल, अशी अपेक्षा आहे. सर्वत्र संघर्ष चुरशीचा असेल, असे अनुमान आहे. अनेक मतदानपूर्व सर्वेक्षणांमधूनही ही स्थिती स्पष्ट झाल्याने उत्सुकता वाढली आहे.

 

कोठे किती जागा…

D आसाम: 126

ड केरळ : 140

ड तामिळनाडू : 234

डी पुडुचेरी: 30

D पश्चिम बंगाल: 294

पेटी

कोठे किती मतदार, मतदान केंद्रे…

पश्चिम बंगाल (प्रथम टप्पा)

मतदार : 3 कोटी 60 लाख 77 हजार 171

मतदान केंद्रे : 44 हजार 378

तामिळनाडू

मतदार : 5 कोटी 67 लाख 7 हजार 380

मतदान केंद्रे : 75 हजार 35

 

Comments are closed.