लाखो मोबाईल फोनवर एकाच वेळी अलर्ट मेसेज पाठवले जातात.
सरकारने घेतली आपत्कालीन सूचना प्रणालीची चाचणी : अचानक आलेल्या ‘सायरन’ संदेशाने लोक चिंतेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरातील अनेक मोबाईल फोनवर शनिवारी सकाळी 11:45 वाजता एकाचवेळी ‘सायरन’चा आवाज ऐकू आला. याप्रसंगी क्रीनवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये एक संदेश दिसला. जेव्हा सायरन वाजणे थांबले तेव्हा तो संदेश मोबाईल फोनवर वाचूनही दाखवण्यात आल्यामुळे अनेक लोक चिंतेत पडले. तर काहीजण गोंधळले. हा संदेश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) पाठवला होता. 2 मे रोजी ‘एनडीएमए’ने आपत्कालीन परिस्थितीत जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम’ची चाचणी घेतल्यामुळे हा संदेश पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्व राज्यांच्या राजधान्या आणि दिल्ली-एनसीआरमधील सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी शनिवारी एक चाचणी संदेश पाठवण्यात आला. हा संदेश हिंदी, इंग्रजी आणि सर्व प्रादेशिक भाषांमध्ये पाठवण्यात आला होता. ‘ही केवळ एक चाचणी असून कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही’ असे या संदेशात म्हटले होते. ‘सतर्क नागरिक, सुरक्षित राष्ट्र’ हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
शनिवारचा संदेश केवळ आपत्कालीन सूचना प्रणालीची चाचणी घेण्यासाठी पाठवण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी सरकारने एक संदेश पाठवून लोकांना याविषयीची कल्पना दिली होती. आपत्कालीन मोबाईल अलर्टच्या चाचणीदरम्यान चाचणी संदेश मिळाल्यास घाबरून जाऊ नये, असे आवाहन सरकारच्यावतीने करण्यात आले होते.
सचेत प्रणाली स्वदेशी बनावटीची
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) या सरकारी संस्थेने, आपत्कालीन परिस्थितीत जनतेला तात्काळ सूचना देण्यासाठी ‘सचेत’ नावाची एक एकात्मिक सूचना प्रणाली विकसित केली आहे. सचेत नावाची ही प्रणाली कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (सीएपी) वर आधारित आहे. ती सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाद्वारे तात्काळ सूचना उपलब्ध होतील. ‘एनडीएमए’ने मोबाईल एसएमएसला सेल ब्रॉडकास्ट (सीबी) तंत्रज्ञानाशी जोडल्यामुळे निवडलेल्या क्षेत्रातील सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी सूचना पाठवल्या जातील. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ माहिती मिळेल.
आतापर्यंत 134 अब्जाहून अधिक सूचना
अहवालानुसार, हवामानातील बदल आणि चक्रीवादळे यांसारख्या विविध नैसर्गिक आपत्तींसाठी या प्रणालीद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. आजपर्यंत, 19 हून अधिक भारतीय भाषांमध्ये 134 अब्जाहून अधिक एसएमएस सूचना पाठवण्यात आल्या आहेत. या प्रणालीचा वापर प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तात्काळ सावध करण्यासाठी केला जाऊ शकतो.
Comments are closed.