दिल्लीतील भीषण हॉटेल आगीत 21 जणांचा मृत्यू;
दिल्लीतील भीषण हॉटेल आगीत 21 जणांचा मृत्यू;
दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतून एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागातील ‘फ्लोरिश स्टे’ या पाच मजली हॉटेलला आज सकाळी अचानक लागलेल्या भीषण आगीत तब्बल २१ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर १० पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या जवळील मॅक्स रुग्णालय आणि एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये तातडीने उपचार सुरू आहेत. या घटनेचे थरारक फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून, या हृदय पिळवटून टाकणाऱ्या अपघाताने संपूर्ण देश शहारला आहे.
सकाळी साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास प्रेस एन्क्लेव रोडवरील या हॉटेलमध्ये अचानक आगीचा भडका उडाला. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमधील इलेक्ट्रिक शेगडी सुरू करताना झालेल्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आग लागताच हॉटेलची वीज खंडित झाली आणि इलेक्ट्रॉनिक मुख्य दरवाजा ऑटोमॅटिक लॉक झाला. त्यामुळे आत अडकलेल्या पर्यटकांना बाहेर पडण्याचा मुख्य रस्ताच बंद झाला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण पाच मजली इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले.
या हॉटेलच्या शेजारीच मोठे रुग्णालय असल्याने, उपचारासाठी देशा-परदेशातून आलेल्या रुग्णांचे नातेवाईक आणि अनेक परदेशी पर्यटक या हॉटेलमध्ये थांबले होते. त्यामुळे मृतांमध्ये परदेशी नागरिकांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीच्या ज्वाळा आणि प्रचंड धुरामुळे जीव वाचवण्यासाठी अनेक लोकांनी थेट दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून खाली उड्या टाकल्या. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने आजूबाजूच्या हॉटेल्समधून गाद्या आणून जमिनीवर अंथरल्यामुळे काहींचे प्राण वाचले, तर काहींना गंभीर दुखापत झाली.
अग्निशमन दल आणि स्थानिक बचाव पथकांनी शर्थीचे प्रयत्न करून धुराच्या वेढ्यातून ३७ जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यापैकी काही जण गंभीर भाजले असून अनेक जण धुरामुळे बेशुद्ध अवस्थेत होते. दरम्यान, या हॉटेलला केवळ ६ खोल्या चालवण्याचा परवाना असताना तिथे बेकायदेशीरपणे २५ खोल्या चालवल्या जात होत्या आणि इमारतीचे तळघरही (बेसमेंट) कुलूप लावून बंद होते, अशा अनेक धक्कादायक बाबी तपासात समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने नियमबाह्य हॉटेल चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाकडून मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आणि गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली सरकार आणि स्थानिक प्रशासन सध्या संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून मृतांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Comments are closed.