भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं आव्हान

TMC राजकीय संकट अद्यतने: ज्या खासदाराला भाजपमध्ये जायचं आहे त्याने आधी तृणमूलच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार महुआ मोईत्रा यांनी केली. या खासदारांनी पुन्हा निवडणूक लढवावी आणि मग जनतेचा कौल घ्यावा, असं आव्हानही त्यांनी दिलं. महुआ मोईत्रा यांनी क्रिकेटपटू युसूफ पठाण याच्यावरही टीका केली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही दिवसांतच पश्चिम बंगालच्या राजकारणात आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात अभूतपूर्व राजकीय भूकंप झाला आहे. आमदारांच्या पाठोपाठ आता तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनीही बंडाचे निशाण फडकावले असून ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे.

पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसच्या 28 लोकसभा खासदारांपैकी तब्बल 20 खासदारांनी केंद्रातील भाजप प्रणीत ‘एनडीए’ (NDA) सरकारला उघड पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. खासदार आणि माजी टीएमसी नेत्या काकोली घोष दस्तीदार यांनी सोमवारी अधिकृतपणे हा खळबळजनक दावा केला. या 20 बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आपला एनडीए सरकारला पाठिंबा असल्याचे लेखी कळवलं आहे.

Mahua Moitra Attack On Rebels : आधी खासदारकीचा राजीनामा द्या, महुआ मोइत्रांची मागणी

पक्षामध्ये झालेल्या या एवढ्या मोठ्या बंडखोरीनंतर टीएमसीच्या आक्रमक खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपल्याच पक्षातील बंडखोर नेत्यांवर आणि खासदारांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. त्यांनी बंडखोरांना थेट आव्हान दिलं.

महुआ मोइत्रा यांनी लिहिलं की, “2024 च्या लोकसभा निवडणुकीत हे सर्व खासदार तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. पश्चिम बंगालच्या जनतेने त्यांना एनडीएला पाठिंबा देण्यासाठी नाही, तर टीएमसीचे उमेदवार म्हणून मतदान केले होते. जे लोक स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी राजकीय भूमिका बदलत आहेत, त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करावा.”

जर कोणत्याही नेत्याला किंवा खासदाराला भाजपमध्ये जायचे असेल, तर त्यांनी आधी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवून जनतेचा कौल घ्यावा. तेव्हा खऱ्या अर्थाने समजेल की जनता कोणाच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत महुआ मोइत्रा यांनी बंडखोरांना आव्हान दिलं.

Yusuf Pathan In Radar : युसूफ पठाण यांच्यावरही गंभीर प्रश्न उपस्थित

महुआ मोइत्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट खासदार आणि भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाण (Yusuf Pathan) याचे नाव घेत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. युसूफ पठाण हे दिल्लीला का जात आहेत? त्यांना अमित शाह यांनी बोलावले आहे का? असा सवाल त्यांनी केला. युसूफ पठाण यांनी भारतासाठी क्रिकेट खेळलं आहे, त्यामुळे ज्या भागातील जनतेने त्यांना इतक्या मोठ्या विश्वासाने निवडून दिले, त्या जनतेप्रती त्यांनी आपली जबाबदारी दाखवावी, असा सल्लाही महुआ यांनी दिला.

West Bengal Politics : आमदारांपाठोपाठ खासदारांचे बंड

पश्चिम बंगालमधील या मोठ्या राजकीय सत्तानाट्यामुळे तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झालं आहे. सध्या लोकसभेत टीएमसीचे 28, तर राज्यसभेत 13 खासदार आहेत. यापूर्वी 3 जून रोजी बंगालमधील टीएमसीच्या 80 आमदारांपैकी तब्बल 58 आमदारांनी बंडखोरी करत एक स्वतंत्र गट स्थापन केला होता. या बंडखोर आमदारांच्या गटाने ‘ऋतब्रता’ यांची आपला नवा नेता म्हणून नियुक्ती केली होती. आमदारांपाठोपाठ आता 20 खासदार फुटल्याने ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे.

तृणमूल काँग्रेसमधील या ऐतिहासिक फुटीमुळे आणि अंतर्गत उथल-पुथलीमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, महुआ मोइत्रा यांच्या या जाहीर हल्ल्यानंतर बंडखोर गटातील प्रमुख नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत किंवा जाहीर प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

ही बातमी वाचा:

Comments are closed.