भारत की आयर्लंड, टी20 मध्ये कोणाचं पारडं जड? वाचा सविस्तर
अफगाणिस्तानला मायदेशात धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये २ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेत श्रेयस अय्यर टी-२० कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. मालिकेतील पहिला सामना २६ जूनला बेलफास्टमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेचं मुख्य आकर्षण म्हणजे, वैभव सूर्यवंशीला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. दरम्यान कसा राहिलाय भारत आणि आयर्लंड यांचा टी-२० रेकॉर्ड? जाणून घ्या.
भारतीय संघ टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघ आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृ्त्वाखाली खेळताना भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावला होता. आता या स्पर्धेनंतर पहिल्यांदाच टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भारतीय संघ दमदार सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या मालिकेसाठी काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ आतापर्यंत ८ वेळेस आमनेसामने आले आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. याआधी २०२४ मध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता. द्विपक्षीय मालिकांमध्येही भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध खेळताना सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ विजयाची मालिका कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे आयर्लंडचा संघ भारताविरूद्ध आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
Comments are closed.