Indus waters Treaty issue आमचे पाणी रोखल्यास हात तोडू! पाकिस्तानच्या मंत्र्याची भारताला धमकी

► वृत्तसंस्था इस्लामाबाद
पाकिस्तानने सिंधू जल करारावरून पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या हिस्स्याचे पाणी कुणी रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे हात तोडू, असे तेथील हवामान बदल विषयक मंत्री मुसादिक मलिक यांनी म्हटले आहे. भारत पाकिस्तानच्या हिस्स्याचे पाणी रोखू इच्छित असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे.

शेजारी देशाच्या पंतप्रधानांच्या हातात एक नळ आहे, पाकिस्तानात पाण्याचा एक थेंबही जाऊ दिला जाणार नसल्याचे म्हणत आहेत, परंतु जे आमच्या हिस्स्याच्या पाण्यावर दावा करतील, त्यांचे हात आम्ही तोडून टाकू असे मुसादिक मलिक यांनी माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले आहे. सिंधू जल करार कायदेशीर स्वरुपात अद्यापही लागू आहे.

भारत हा करार एकतर्फी स्थगित करू शकत नाही, रद्द करू शकत नाही आणि यात बदलही करू शकत नसल्याचा दावा तरार यांनी केला आहे.

सिंधू जल करारावर चर्चासत्र
सिंधू जल करारावर पहिले आंतरराष्ट्रीय चर्चासत्र इस्लामाबादमध्ये आयोजित केले जाणार आहे. यात कायदेशीर तज्ञ, जलतज्ञ आणि विदेशी प्रतिनिधी सामील होतील. चर्चासत्रात कराराच्या कायदेशीर आणि तांत्रिक पैलूंवरही चर्चा होणार असल्याचे पाकिस्तानच्या मंत्र्यांनी सांगितले आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंतर्गत पाकिस्तानचे अधिकार सुरक्षित आहेत. पाणी आमची जीवनरेषा आहे आणि हीच आमची रेडलाइन देखील असल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांनी स्पष्ट केले असल्याचा उल्लेख तरार यांनी केला.

भारताविरोधात युद्ध पुकारू
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी 21 जून रोजी सिंधू जल करार स्थगित करण्यावरून भारताला धमकी दिली होती. आमची जलसुरक्षा धोक्यात आल्याचे वाटताच आम्ही भारताच्या विरोधात युद्ध पुकारू शकतो. भारत पाकिस्तानच्या हिस्स्याच्या जलप्रवाहात अडथळे निर्माण करत आहे आणि रणनीतिक अस्त्र म्हणून त्याचा वापर करत असल्याचा आरोप आसिफ यांनी केला आहे.

Comments are closed.