भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखाना कोसळला, कामगार जेवायला गेल्याने जिवितहानी टळली; पालिका प्रशासनाच्या नाकर्तपणावर प्रश्नचिन्ह
भिवंडी शहरातील नागाव भागात आज मोठी दुर्घटना टळली. १०० फुटी रस्त्यालगतच्या न्यू आजमी कंपाऊंड येथे असलेला सलमा अन्वर खान यांच्या मालकीचा यू एस टेक्सटाईल नावाचा यंत्रमाग कारखाना दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात काम करणारे सहा कामगार जेवायला गेल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला.
मात्र अन्य दोन कामगार जखमी झाले आहेत. दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा आणि धोकादायक कारखाने असूनही केवळ नोटिसा बजावण्याचे काम करीत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यू एस टेक्सटाईल या यंत्रमाग कारखान्याची इमारत धोकादायक असल्याने त्यास नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतरही येथे काम सुरू होते. आज दुपारी १२.३० ते १च्या सुमारास हा कारखाना अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ही दुर्घटना घडली त्याच्या काही मिनिटे आधी येथे काम करणारे सहा कामगार जेवायला बाहेर पडल्याने ते बचावले. परंतु अन्य दोन कामगार बाहेर निघत असतानाच कारखाना कोसळल्याने ते जखमी झाले आहेत. मात्र त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पालिका उपायुक्त सपना वसावा यांसह पालिका अधिकारी अग्निशामक दल, आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.
बळी गेल्यावर पालिकेला जाग येणार का?
पालिका प्रशासनाने धोकादायक ठरवलेल्या मालमत्तांना नोटीस बजावल्यानंतरही त्या रिकाम्या केल्या जात नाहीत. त्यामुळे भिवंडी परिसरात राजरोसपणे अनधिकृत आणि धोकादायक कारखाने सुरू आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून एखादी दुर्घटना घडून बळी गेल्यावर पालिकेला जाग येईल का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त कारखान्याच्या मालकावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त सपना वसावा यांनी दिली आहे.
Comments are closed.